Sambhajinagar News : पैठणगेटवर अर्धवट पाडलेल्या दुकानांतूनच व्यवसाय सुरू
Business continues from partially demolished shops at Paithan Gate
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : महापालिकेने पैठणगेट, सब्जीमंडी आणि खोकडपुरा भागातील अतिक्रमणावर कारवाई करत शेकडो दुकाने पाडली. यात पैठणगेट पार्किंगच्या मागील मोबाईल मार्केटमधील बाधित जागेवर असलेली सर्व दुकाने हटवण्यात आली, परंतु कारवाईच्या दोन दिवसांतच शुक्रवारी (दि.२१) सकाळी अर्धवट पाडलेल्या जागेत मोबाईल विक्रेत्यांसह चहा, गाडी दुरुस्तीची दुकाने उघडली असून, काही व्यापाऱ्यांनी मलब्याच्या ढिगाऱ्यावर दुकान थाटल्याचे दृश्य शुक्रवारी (दि.२१) सकाळी दिसून आले.
महापालिकेच्या अतिक्रमण हटाव कारवाईनंतर पैठणगेट परिसर मोकळा आणि स्वच्छ होईल, अशी आशा नागरिकांनी बाळगली होती. मोठ्या खर्चातून केलेली ही कारवाई दीर्घकालीन ठरेल, अशी अपेक्षा होती. मात्र कारवाईच्या दोन दिवसांत परिस्थिती जैसे थे झाल्याचे शुक्रवारी दिसून आले. कारवाईत पाडलेली जागा अजूनही मलब्याने भरलेली असतानाच काही दुकानदारांनी तेथे तात्पुरते गाळे उभारून व्यापार सुरू केला. यात मोबईल दुरुस्ती, चहा-नाश्त्याचे स्टॉल्स, छोट्या गॅरेजेस आणि अनधिकृत पार्किंग पुन्हा सुरू झाल्याचे दृश्य दिसून आले. त्यामुळे परिसरात पुन्हा गर्दी आणि वाहतूक कोंडी वाढली असून, धुळीचाही त्रास कायम आहे.
महापालिकेने हटवलेल्या अतिक्रमणावर एवढ्या लवकर पुन्हा व्यवसाय सुरू झाल्याने संपूर्ण कारवाईवरच प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. कारवाई करताना महापालिका आक्रमक दिसते, पण दोन दिवसांतच हे दुकानदार पुन्हा बसतात. नियमित देखरेखच होत नाही, अशी नाराजी स्थानिक रहिवाशांनी व्यक्त केली. दुसरीक छोट्या व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे की घरखर्च चालवण्यासाठी पुन्हा व्यापार सुख् करणे भाग असून, यावरच आमच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह अवलंबून आहे.
वाहतूक कोंडी, धुळीने नागरिक त्रस्त
अतिक्रमण हटवल्यानंतर रस्ते मोकळे होतील, वाहतूक नियमन होईल आणि पार्किंगची अडचण दूर होईल, अशी महापालिकेची अपेक्षा होती. पण प्रत्यक्षात या भागात पुन्हा गोंधळ दिसून येत असून, नागरिकांना गाड्या कोंडीत अडकण्यासह धुळीत श्वास घेण्याचा त्रास सहन करावा लागत आहे. महापालिका पुढील काळात या ठिकाणी कडक पावले उचलते का, आणि पुन्हा नव्याने अतिक्रमण रोखण्यासाठी कायमस्वरूपी उपाययोजना करते का, याकडे शहरवासीयांचे लक्ष लागले आहे.

