

Be careful while playing Rangpanchami
राहुल जांगडे
छत्रपती संभाजीनगर: मनसोक्त रंगांची उधळण करत उत्साह आणि आनंदाचा सण म्हणजेच धूलिवंदन. मात्र याच उधळलेल्या किंवा चेहऱ्याला लावलेल्या रंगांमुळे जेव्हा त्वचेचे नुकसान होते, तेव्हा सणाचा आनंद भंग पावतो. त्यामुळे होळी खेळताना कोरडे नैसर्गिक रंग वापरावेत. शरीरावर भरपूर खोबऱ्याचे तेल अथवा मॉइश्चरायझर लावावे. केस मोकळे न सोडता घट्ट बांधावेत आणि स्कार्फ किंवा टोपी घालावी, असा महत्त्वपूर्ण सल्ला त्वचारोग तज्ज्ञांनी दिला आहे.
दरवर्षीप्रमाणे यंदाही होळीनिमित्त शहरातील रंगबाजार सजले असून, खरेदीसाठी नागरिकांची रेलचेल सुरू आहे. उद्या, मंगळवारी विविध रंगांची उधळण करत रंगोत्सव साजरा केला जाणार आहे. यासाठी विविध मंडळांसह तरुण आणि नागरिकांनी जय्यत तयारी केली आहे. मात्र, घातक रंगांची भीतीही कायम आहे. बाजारात सध्या नॉन टॉक्सिक रंगही उपलब्ध आहेत.
हे रंग पूर्णपणे रसायनमुक्त नसले तरी, पाण्याने सहजरीत्या निघू शकतील अशा घटकांपासून बनवलेले असतात. रासायनिक आणि केमिकल युक्त रंगांचा त्वचेवर गंभीर परिणाम होऊ शकतो. त्यामुळे रंग खेळायला जाताना शक्यतो अंगभर जाड कपडे घालावेत. शरीराच्या उघड्या भागांवर जसे की चेहरा, हात आणि मान यावर भरपूर प्रमाणात खोबऱ्याचे तेल किंवा मॉइश्चरायझर लावावे. ओठांना व नखांच्या बाजूला व्हॅसलीन लावण्याचा सल्लाही तज्ज्ञांनी दिला आहे.
त्वचेला मायक्रोइंज्युरीचा धोका
चमकीच्या आणि केमिकल रंगांमुळे त्वचेची आग होते, पुरळ येतात आणि त्वचेचे गंभीर आजार उद्भवू शकतात. चमकीच्या रंगांमध्ये मायका व फाईन ग्लास पावडरचा वापर केला जातो. हे रंग लावल्यास त्वचेला अतिसूक्ष्म मायक्रोइंज्युरी पोहोचते. चमकीच्या रंगांचा वापर टाळावा.