Arrest the Union Education Minister under Section 302
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : नीट प्रश्नपत्रिका फुटीचे प्रकरण अतिशय गंभीर आहे. केंद्रातील सरकार मुलांच्या भविष्यासोबत खेळत आहे. परीक्षा रद्द झाल्याने काही मुलांनी आत्महत्या केल्या आहेत. त्यामुळे केंद्रीय शिक्षण मंत्र्यांना ३०२ च्या कलमाखाली अटक झाली पाहिजे, अशी मागणी शिवसेना उबाठा पक्षाचे आमदार अंबादास दानवे यांनी केली.
नीट परीक्षेला देशभरातून २२ लाखांहून अधिक विद्यार्थी बसले होते. याचा उल्लेख करून दानवे म्हणाले, खरंतर हा विषय सरकारने अजूनही सिरियसली घेतलेला नाही. परीक्षेच्या नवीन तारखा जाहीर झाल्या असल्या तरी २२ लाख ७९ हजार विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली आहे.
हे विद्यार्थी देशाचे भविष्य आहेत. नीट देणारे विद्यार्थी दोन दोन वर्षे तयारी करतात आणि तयारी केल्यानंतर पेपर फुटतो, त्याला पूर्णपणे केंद्राच सरकार त्यांचे मंत्री, त्यांचे खाते जवाबदार आहे. मुलाच्या भविष्यासोबत ते खेळले आहेत, या सरकारच्या मंत्र्याला ३०२ खाली अटक झाली पाहिजे. आत्महत्येसाठी सरकार प्रवृत्त करत आहे.
पाच पाच लाखांपासून पन्नास लाखांपर्यंत पेपर फोडणे हे गरिबाचं काम नाही. गरिबाच्या पोरांनी अभ्यास करायचा, रात्ररात्र जागरण करून पेपर द्यायचे आणि श्रीमंताच्या पोरांनी पेपर फोडायचा आणि परीक्षा द्यायची. हे चुकीचे आहे, देशाच्या पंतप्रधानांनी यावर कठोर भूमिका घ्यायला हवी. परंतु दुर्दैवाने आपल्या पंतप्रधानांनी यावर आतापर्यंत अवाक्षरही काढलेले नाही, असेही दानवे म्हणाले.
कांदाप्रश्नावर सोमवारी आंदोलन
कांद्याच्या भावाचा प्रश्न गंभीर बनला आहे. त्यावर सोमवारी शिवसेनेच्यावतीने वैजापूर येथे आंदोलन करण्यात येणार आहे. या आंदोलनात शेकडो हजारो शेतकरी सहभागी होणार आहेत. कांद्याला दोन हजार रुपये भाव दिला पाहिजे अशा प्रकारची मागणी आम्ही केलेली आहे, असे दानवे यांनी सांगितले.