

छत्रपती संभाजीनगर : रमाई घरकुल योजनेतील कथित गैरव्यवहारात महापालिका आणि समाजकल्याण विभागातील काही अधिकारी, प्रस्ताव तयार करणारी टोळी तसेच काही सत्ताधारी पक्षाचे राजकीय पदाधिकारी व नगरसेवक सहभागी असल्याचा गंभीर आरोप सोमवारी (दि.१३) ठाकरे सेनेचे आमदार तथा नेते अंबादास दानवे यांनी केला. या प्रकरणाची चौकशी विद्यमान विभागीय आयुक्तांकडून न करता अन्य विभागीय आयुक्तांकडून करण्यात यावी, अशी मागणीही त्यांनी केली. क्रांती चौक येथील मातृभूमी प्रतिष्ठानच्या संपर्क कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत दानवे बोलत होते.
यावेळी आ. दानवे म्हणाले, महापालिकेत रमाई घरकुल योजनेत मोठ्या प्रमाणावर गैख्यवहार झाला असून, लाभार्थीच्या नावाने प्रस्ताव तयार करणारी टोळी कार्यरत होती. या प्रकरणात महापालिका व समाजकल्याण विभागातील काही अधिकारी, प्रस्ताव तयार करणारे दलाल तसेच काही सत्ताधारी पक्षाचे राजकीय पदाधिकारी आणि नगरसेवकांचा सहभाग असल्याचा आरोप त्यांनी केला.
या प्रकरणाची चौकशी विभागीय आयुक्तांकडून होणार असली तरी विद्यमान विभागीय आयुक्त यापूर्वी महापालिका आयुक्त म्हणून कार्यरत होते. त्यामुळे निष्पक्ष चौकशीसाठी अन्य विभागीय आयुक्तांची नियुक्ती करण्यात यावी, यासाठी शासनाकडे पत्र देणार असल्याचे दानवे यांनी स्पष्ट केले. यावेळी त्यांनी नुकत्याच पार पडलेल्या पावसाळी अधिवेशनातील कामकाजाची माहिती दिली. बारा दिवसांच्या अधिवेशनात मराठवाड्याशी संबंधित ४३ प्रश्न विधान परिषदेत उपस्थित केल्याचा दावा त्यांनी केला.
शहराचा पाणीप्रश्न, घनकचरा व्यवस्थापन, संतपीठ, मल्टीस्पेशालिटी रुग्णालय, मराठवाडा वैधानिक विकास मंडळाची पुनर्रचना, शेतकऱ्यांची कर्जमाफी आदी विषय सभागृहात मांडल्याचे त्यांनी सांगितले. तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विक्रमी कार्यकाळावर बोलताना राज्यात भ्रष्टाचार वाढला असून, कायदा-सुव्यवस्थेची स्थिती ढासळल्याचा आरोप त्यांनी केला.
तसेच केवळ कालावधी नव्हे तर प्रभावी कारभार महत्त्वाचा असल्याचे दानवे म्हणाले. तर लाडकी बहीण योजनेचा आर्थिक भार सरकारला पेलवत नसल्याने लाभार्थी महिलांची संख्या कमी करण्याचा निर्णय घेतला जात असल्याचा आरोप दानवे यांनी केला. या पत्रकार परिषदेला ठाकरे सेनेचे उपनेते सुभाष पाटील, सहसंपर्कप्रमुख विजयराव साळवे, शहरप्रमुख हरिभाऊ हिवाळे, दिग्वीजय शेरखाने, उपजिल्हाप्रमुख संतोष खंडके, मनपा गटनेते गणेश लोखंडे, महिला आघाडीच्या संपर्क संघटक सुनीता आऊलवार, सहसंपर्क संघटक सुनीता देव, अनिता मंत्री, जिल्हा संघटक आशा दातार, महानगर संघटक सुकन्या भोसले आदींची उपस्थिती होती.
बाबा फर्जन यांच्या घरातील रोकड अधिक असण्याचा संशय
दिवंगत बाबा फर्जन यांच्या घरावरील पोलिसांच्या धाडीत साडेपाच कोटी रुपयांची रोकड जप्त करण्यात आली. मात्र प्रत्यक्षात ही रक्कम त्यापेक्षा अधिक असावी आणि पोलिसांनी आकडे लपविले असावेत, असा संशय आमदार अंबादास दानवे यांनी व्यक्त केला. यासंदर्भात आपण पोलिस आयुक्तांशी दूरध्वनीवरून चर्चा केल्याचे त्यांनी सांगितले.
कोविडपूर्व काळात बाबा फर्जन यांच्याकडे आपले येणे-जाणे होते, हे लपविण्याचे कारण नसल्याचे स्पष्ट करत त्यांच्याकडे शस्त्र परवाने होते आणि शहरातील आक्रमक हिंदुत्ववादी नेतृत्व म्हणून त्यांची ओळख असल्याचेही त्यांनी नमूद केले. पालकमंत्री संजय शिरसाट यांनीही संपत्तीबाबत प्रश्न उपस्थित केल्याचे निदर्शनास आणून दिल्यावर, माझाही तोच मुद्दा आहे, या विषयावर आमचे एकमत आहे, असे आमदार अंबादास दानवे यांनी यावेळी सांगितले.
जिल्हा बँकेचा अध्यक्ष शेतकरी प्रतिनिधीच असावा
जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक ही शेतकऱ्यांची संस्था असल्याने अध्यक्षपदी शेतकरी प्रतिनिधीलाच संधी मिळावी, अशी भूमिका दानवे यांनी मांडली. आपण अध्यक्षपदाच्या शर्यतीत नसून, आपले मत निर्णायक ठरू शकते. मात्र अद्याप कोणत्याही इच्छुकाने संपर्क साधलेला नसल्याचे त्यांनी सांगितले. अध्यक्षपदाची निवडणूक २० जुलै रोजी होणार आहे. त्याला अजून वेळ आहे. काही दिवसांत अध्यक्षपदाचा उमेदवार कोण असणार हे स्पष्ट होईल, असे दानवे म्हणाले.