

Allegations of multi-crore financial irregularities in PHC solar project
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रे आणि आरोग्य उपकेंद्रांवरील सोलर प्रकल्पात मोठा आर्थिक घोटाळा झाल्याचा आरोप जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीच्या बैठकीत गुरुवारी (दि.१६) झाला. १५ हून अधिक ठिकाणी सोलर यंत्रणा बसविण्यात न येताच कंत्राटदारांना तब्बल ८० टक्के बिले अदा करण्यात आल्याचा गंभीर मुद्दा सदस्य पंकज ठोंबरे यांनी उपस्थित केला. यावर संतप्त झालेल्या अध्यक्ष, उपाध्यक्ष, सभापती आणि सदस्यांनी आरोग्य विभागाला चांगलेच धारेवर धरत संबंधित कंत्राटदारांना नोटिसा बजावून ब्लॅकलिस्ट करावे आणि दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी एकमुखी मागणी केली.
बैठकीत उपाध्यक्ष जितेंद्र जैस्वाल यांनी सोलर प्रकरणावरून आक्रमक भूमिका घेत जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांवर प्रश्नांची सरबत्ती केली. ते म्हणाले आळंद प्राथमिक आरोग्य केंद्रात सोलर पॅनेल, इन्व्हर्टर आणि बॅटऱ्या आणून ठेवूनही यंत्रणा सुरू न केल्याचा मुद्दा उपस्थित केला. दोन महिन्यांपूर्वी प्रशासनाच्या
निदर्शनास ही बाब आणूनही कारवाई का झाली नाही, असा सवाल करत संबंधित एजन्सीची उलट तपासणी करून तातडीने कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली. पंकज ठोंबरे यांच्यासह अन्य सदस्यांनी कामाची जबाबदारी प्रशासनाचीच असल्याचे स्पष्ट करत काही अधिकारी व कंत्राटदारांच्या संगनमताचा संशयही व्यक्त केला. अध्यक्ष अविनाश गलांडे यांनी या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याचे आदेश मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना दिले. संबंधित कंत्राटदारांवर कठोर कारवाई करण्यासह निष्काळजीपणा खपवून घेतल जाणार नसल्याचा इशाराही त्यांनी दिला.
महिनाभरात चौकशी पूर्ण करा - सभापती गरड अर्थ व बांधकाम सभापती सचिन गरड यांनी सोला प्रकरणाचा तातडीने ठराव करून एका महिन्याच्या आ चौकशी पूर्ण करण्याची मागणी केली. चौकशी वेळेन पूर्ण न झाल्यास जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांवरह कारवाई करण्यात यावी, अशी मागणी त्यांनी बैठकी केली.
तत्कालीन सीईओंनी काढली होती निविदा
तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी विकास मीना यांनी ६ फेब्रुवारी २०२४ रोजी जिल्हा वार्षिक योजनेतून १४ कोटी १६ लाख रुपयांची निविदा काढली होती. या अंतर्गत १८ प्राथमिक आरोग्य केंद्रांचे 'स्मार्ट पीएचसी' मध्ये रूपांतर तसेच ८४ आरोग्य उपकेंद्रांमध्ये ४ किलोवॅट क्षमतेच्या सोलर यंत्रणा बसविण्याची कामे प्रस्तावित होती. मात्र, अनेक ठिकाणी काम पूर्ण न करताच बिले अदा झाल्याचा आरोप आता समोर आला आहे.