

All teachers should do work so that the society takes notice: Governor Bagde
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा शिक्षकांनी आहोरात्र परिश्रम करून भारताची संस्कृती अन् इतिहास समाजाच्या तळागाळात पोहचवण्याचे काम करावे. प्रकाश सोनवणे यांच्या कार्याची दखल जशी समाजाने घेतली, तशीच दखल प्रत्येक शिक्षकांची घेतली जावे, असे प्रतिपादन राजस्थानचे राज्यपाल हरिभाऊ बागडे यांनी गुरुवारी (दि.२०) व्यक्त केले.
ज्ञानसंदीप शिक्षण संस्थेचे अध्यक्ष तथा सेवानिवृत्त मुख्याध्यापक प्रकाश सोनवणेंचा बागडे यांच्या हस्ते सपत्निक सेवागौरव करण्यात आला, त्यावेळी ते बोलत होते. मंचावर पालकमंत्री संजय शिरसाट, बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे, आमदार विक्रम काळे, महापौर समीर राजूरकर, संगीता खिल्लारे, ज्येष्ठ विधिज्ञ मिलिंद जोशी, डॉ. शेखर मगर, एकनाथ पाखरे, नबी पटेल, नगरसेविका भारती सोनवणे, किशोर नागरे आदींची उपस्थिती होती. बागडे म्हणाले, शिक्षकांनी कायम समाजात नवा आदर्श पेरणे गरजेचे असते. शिक्षक समाजाला दिशा देण्याचे काम करत असतो.
विक्रम काळे म्हणाले, विद्यार्थ्यांच्या जीवनातील अंधार दूर करण्याचे काम शिक्षक करत असतो. हेच काम सोनवणे यांनी केले. प्रकाश सोनवणे सत्काराला उत्तर देताना भावनाविवश झाले होते. यावेळी प्रकाश सोनवणे; वंचितांचा ज्ञानदीप या गौरव ग्रंथाचे प्रकाशन करण्यात आले. डॉ. मगर यांनी प्रास्ताविक केले.
गौतम लांडगे, ज्ञानेश्वर ढाकणे, सुनील खंडागळे, बी. बी. शिंदे, मिलिंद जोशी, नबी पटेल यांनी मनोगत व्यक्त केले. संदीप ढाकणे यांनी सूत्रसंचालन केले. एकनाथ पाखरे यांनी आभार मानले. कार्यक्रमासाठी अशोक कांबळे, प्रा. विलास पांडे, संदीप सोनवणे, अभिजीत सोनवणे, किरणकुमार सोनवणे यांनी प्रयत्न केले.