

Administration, politicians clash over banner-making
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा :
शहरातील महापुरुषांच्या पुतळ्यांचा परिसर अनधिकृत बॅनरबाजीने झाकून गेला असून, मनपा आयुक्तांनी बेकायदेशीर कृत्ये थांबवावीत, अशी सूचना महापौर समीर राजूरकर यांनी केली. यावर मनपा आयुक्त जी. श्रीकांत यांनी अत्यंत आक्रमक पवित्रा घेत लोकप्रतिनिधींनाच घरचा आहेर दिला. रस्त्यावर खांब दिसला की बॅनर लावले जातात, पण कारवाई करताना अनेकांचे फोन येतात. आमच्या अधिकाऱ्यांना सर्वसाधारण सभेत बघून घेण्याच्या धमक्या, दम दिला जातो. तुम्ही सांगितले तर मंत्री, आमदारच काय, पण भावी नगरसेवकांचेही बॅनर काढतो, असा थेट इशारा आयुक्तांनी दिला. यामुळे येत्या काळात प्रशासन आणि नगरसेवक असा नवा संघर्ष पेटण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत.
शिवजयंती उत्सवाच्या पार्श्वभूमीवर सोमवारी (दि.१६) शहर पोलिसांनी आयोजित केलेल्या समन्वय समितीच्या बैठकीत दोघेही बोलत होते. यावेळी मंचावर पृथ्वीराज पवार, किशोर शितोळे, अनिल मकरिये, जोतिराम पाटील, हर्षवर्धन कराड, पोलिस आयुक्त प्रवीण पवार, उपायुक्त रत्नाकर नवले, प्रशांत स्वामी, तहसीलदार उमेश पाटील यांच्यासह अन्य अधिकारी, पदाधिकारी उपस्थित होते.
महापौरांनी स्पष्ट केले की, शिवजयंती हा शिस्तीचा उत्सव असून, आपण सर्वांसाठी आदर्श निर्माण केला पाहिजे. केवळ मिरवणूक न काढता महाराजांची युद्धनीती आणि अर्थनीती, स्वराज्य उलगडणारे तीन दिवसांचे व्याख्यान आयोजित करावे, अशी मागणी समीर राजूरकरांनी केली. यावेळी ज्योतीराम पाटील यांच्याकडून शहरात चार ठिकाणी हेलिकॉप्टरने पुष्पवृष्टी केली जाणार असल्याचे सांगत असा आदर्श सर्वांनीच घ्यावा, असेही त्यांनी स्पष्ट केले.
तर मनपा आयुक्त म्हणाले की, बॅनर लावणाऱ्यानी सीसीटीव्ही कॅमेरेही सोडले नाही. बॅनर हटवणे आमचे कर्तव्य आहे, पण कारवाई करताना राजकीय हस्तक्षेप होतो. आता कोणाचीही गय केली जाणार नाही. यंदा क्रांती चौक बॅनरमुक्त करण्यासाठी कडक कारवाई केली जाईल, असा इशारा त्यांनी दिला. लोकप्रतिनिधींनी आणि शिवभक्तांनी स्वतःहून पुढाकार घेऊन ही बॅनरबाजी थांबवावी, सहकुटुंब लोक उत्सवात सहभागी होतील, असा उत्सव साजरा करू, या असे आवाहनही त्यांनी केले.
बैठकीला खासदार, मंत्री, आमदारांची दांडी
शहरात व विधानसभा व विधानपरिषद असे ८ आमदारांचे वास्तव्य आहे. यामध्ये खा. संदीपान भुमरे, कल्याण काळे, डॉ. भागवत कराड, पालकमंत्री संजय शिरसाट, मंत्री अतुल सावे, आ. प्रदीप जैस्वाल, अन-राधा चव्हाण, संजय केणेकर, सतीश चव्हाण, विक्रम काळे यापैकी एकही खासदार, आमदार बैठकीला उपस्थित नव्हते हे विशेष मंचावरच जुंपली : पृथ्वीराज पवारांनी महापौरांना सुनावले.
बैठकीत मंचावरच एक वेगळा प्रसंग पाहायला मिळाला. महापौर समीर राजूरकर मंचावर उशिरा पोहोचल्यानंतर पोलिस आयुक्त प्रवीण पवार यांनी त्यांचे स्वागत केले. यावेळी राजूरकरांनी छायाचित्र काढताना पृथ्वीराज भाऊ आले का? अशी विचारणा केली. यावर ज्येष्ठ पदाधिकारी पृथ्वीराज पवार यांनी महापौरांना मंचावरच सुनावले. अरे, तू जन्मला नव्हतास तेव्हापासून मी जयंती साजरी करतो, मला हौस नाही, असे म्हणत पवारांनी राजूरकरांना कानपिचक्या दिल्या.