

Action against vehicles without high-security number plates
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : हाय सिक्युरिटी नंबर प्लेटची मुदत संपताच आरटीओचे पथक कारवाईसाठी कंबर कसून रस्त्यावर उतरले आहे. मात्र विना क्रमांक असलेली वाहन मात्र शहरात विविध मार्गावर सुसाट धावत आहेत. याकडे आरटीओचे पथक कानाडोळा करत असल्याने सर्वसामान्य वाहनधारकांकडून या कारवाईवर संताप व्यक्त करण्यात येत आहे.
हाय सिक्युरिटी नंबर प्लेटसाठी ३० जून अखेरची मुदत देण्यात आली होती. मुदत संपताच १ जुलैपासूनच आरटीओचे पथक रस्त्यावर उरतले आहे. हे पथक दररोज सुमारे १५० ते २०० अशा नंबर प्लेट नसलेल्या वाहनांवर कारवाई करत आहे. यादरम्यान शहरातील विविध मार्गावर मात्र विनाक्रमांकाची वाहने सुसाट धावत आहेत.
यात प्रामुख्याने हायवांचा समावेश आहे. ही वाहने मुख्य रस्त्यासह शहरातही धावत आहेत. काही वाहनधारकांनी तर चक्क क्रमांक मिटवला आहे. असे असतानाही हाय सिक्युरिटी नंबर प्लेटची कारवाई करणाऱ्या पथकाला मात्र ही वाहने दिसत नसल्याने नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे.
विना क्रमांक हायवा असो की इतर अवजड वाहने, विना क्रमांक धावत आहेत. या वाहनांकडून अनेक अपघात झाले आहेत. त्यांच्यावर नाम मात्र कारवाई होते. एकीकडे २० वर्षे जुन्या वाहनांना हाय सिक्युरिटी नंबर प्लेट नसल्याने कडक कारवाई करण्यात येत आहे. तर दुसरीकडे विनाक्रमांकाच्या वाहनांकडे कानाडोळा करण्यात येत आहे. आरटीओच्या या भेदभावाच्या कारवाईमुळे सर्वसामांन्य नागरिक संतप्त झाला आहे.