

A young man who was on his way to visit the Kanoba temple died in an accident
खुलताबाद, पुढारी वृत्तसेवाः कान्होबा (बडोद) येथे कानिफनाथ महाराजांच्या दर्शनासाठी निघालेल्या तरुणावर काळाने झडप घातल्याची हृदयद्रावक घटना गुरुवारी दुपारी घडली. खुलताबाद -फुलंब्री मार्गावरील गदाना गावाजवळ, सुशील घुसळे झालेल्या भीषण रस्ते अपघातात एका तरुणाचा जागीच मृत्यू झाला असून दुसरा तरुण गंभीर जखमी झाला आहे.
या अपघातात सुशील सुखदेव घुसळे (वय ३३, रा. लहानीआळी, राजवाडा, खुलताबाद) याचा मृत्यू झाला तर दुचाकीवरील दुसरा तरुण अजय संजय शिरसाट (वय २६, रा. मालुंजा, ता. गंगापूर, सध्या मुक्काम साळीवाडा, खुलताबाद) गंभीर जखमी झाला आहे.
गुरुवारी दुपारी सुमारे तीन वाजण्याच्या सुमारास हा अपघात घडला. बुलेटने (एम एच २० जी एम ५०००) दोघे तरुण खुलताबाद येथून वडोद (कान्होबा) येथे दर्शनासाठी जात होते त्याच वेळी फुलंब्रीकडून खुलताबादकडे येणारे पिकअप (एम एच २० जे.सी. ३०५२) यांची गदानाजवळ समोरासमोर जोरदार धडक झाली.
या अपघातात सुशील घुसळे याच्या डोक्याला व मेंदूला जबर मार लागला. अपघातानंतर रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या सुशीलला तातडीने रुग्णालयात नेण्यात आले; मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. पुढील कायदेशीर तपासणीसाठी मृतदेह खुलताबाद येथील शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आला.
अपघातात दुचाकीवरील दुसरा तरुण अजय शिरसाटच्या दोन्ही पायांना गंभीर दुखापत झाली. प्राथमिक उपचारानंतर त्याला तातडीने छत्रपती संभाजीनगर येथील घाटी रुग्णालयात हलवण्यात आले आहे.
अपघाताची माहिती मिळताच खुलताबाद पोलिस घटनास्थळी दाखल झाले. अपघातग्रस्त वाहने बाजूला करून वाहतूक सुरळीत करण्यात आली. या प्रकरणी खुलताबाद पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली असून पिकअप वाहनचालकाला ताब्यात घेण्यात आले आहे. अपघात नेमका कसा झाला, याबाबत पोलिस पुढील तपास करीत आहेत.
कुटुंबाचा आधार
सुशील घुसळे हा आपल्या कुटुंबाचा आधारस्तंभहोता. तो व्यवसायाने डीजे चालक असून मेहनती व मनमिळावू स्वभावाचा म्हणून परिसरात परिचित होता. त्याच्या मृत्यूमुळे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. सुशीलच्या पश्चात पत्नी, आई-वडील, बहीण व भाऊ असा परिवार आहे. घरातील कर्ता पुरुष अचानक काळाच्या पडद्याआड गेल्याने कुटुंबीयांचा आक्रोश पाहून उपस्थितांचे डोळे पाणावले.
मार्गावर वारंवार अपघात
खुलताबाद-फुलंब्री मार्गावर वारंवार अपघात होत असल्याने नागरिकांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे. या मार्गावर वेगमर्यादा, सूचना फलक व वाहतूक नियंत्रणाची आवश्यकता असल्याची मागणी ग्रामस्थ व वाहनचालकांकडून होत आहे.