Water Crisis : ऐन मनपा निवडणुकीतच शहरात पाणीबाणी
A water crisis has hit the city right in the middle of the municipal elections
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा :
महापालिकेच्या प्रत्येक निवडणुकीत शिवसेना-भाजपकडून मतदारांना दररोज आणि मुबलक पाणीपुरवठ्याचे स्वप्न दाखविले जाते. दोन दशकांपासून सत्ताधारी पक्ष असेच सांगून मतदान मिळवत आहेत. परंतु अद्यापही आश्वासन अपूर्णच असून, पाच दिवसांआड मिळणारे पाणी आठ दिवसांवर गेले आहे. त्यात आता ऐन निवडणुकीतच शहराचा पाणीपुरवठा विस्कळीत होण्याचे सत्र सुरू झाले आहे. मंगळवारी पुन्हा दहा तास पाणीपुरवठा बंद राहिल्याने मतदारांतून संताप व्यक्त करण्यात आला.
फारोळा जलशुद्धीकरण केंद्रातून छत्रपती संभाजीनगर शहरास पाणीपुरवठा करण्यात येणाऱ्या ५६ व १०० द.ल.ली. आणि २६ द.ल.लि. पुनर्जीवन योजनेच्या पंपगृहाचा वीज पुरवठा अचानक मंगळवारी पहाटे ४.२५ वाजता बंद झाला. त्यामुळे पाणीपुरवठा विभागाच्या कर्मचाऱ्यांनी काय बिघाड झाला, याची पाहणी करून सर्व इनकमिंग पॅनलचे वायर तपासण्यात आले. त्यानंतर पहाटे ६ वाजता सप्लाय स्टॅन्ड करण्यात आला. परंतु, पुन्हा महाविरतण कंपनीच्या २२० केव्ही फिडरमध्ये ट्रिपिंग झाल्याने संपूर्ण विद्युत पुरवठा खंडित झाला.
याबाबत महापालिका पाणीपुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांनी महाविरतण कंपनीच्या अभियंत्यांशी मोबाईलवरून संपर्क साधला. त्यानंतर सकाळी ७.३३ वाजता ३३ केव्ही बिडकीन फिडरवरून वीज पुरवठा घेऊन २६ द.ल.लि. व ५६ द.ल.लि. (जुने फारोळा पंपगृह) योजनेवरील पंप ८.३५ वाजता सुरू करण्यात आला.
दरम्यान. यासोबतच महापालिकेच्या कर्मचाऱ्यांमार्फत युद्धपातळीवर नवीन फारोळा पंपगृह येथील सर्व पॅनल, सबस्टेशन, ट्रान्सफॉर्मर आदीची तपासणी करून पंपिंग मशिनरी सुरू करण्यासाठी आवश्यक ती कारवाई करून नवीन फारोळा पंपगृह येथील २००० केव्हीए क्षमतेचा ट्रान्सफॉर्मर क्र. १ व २ मध्ये तांत्रिक बिघाड झाल्यामुळे ट्रान्सफॉर्मर क्र. ३ व ४ (२००० केव्हीए) चार्ज करून दुपारी ३ वाजता १०० द.ल.लि. योजनेवरील पंपिंग पूर्ववत सुरू केली, तर १०० द.ल.लि. योजना म्हणजेच मुख्य १२०० मिमी व्यासाची जलवाहिनीचा पाणीपुरवठा १०.४० वाजता सुरू करण्यात आला आहे.
मुख्य जलवाहिनी ११ तास बंद
शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या ७०० आणि ९०० मिमी व्यासाच्या जलवाहिनीचा पाणीपुरवठा पहाटे ४.२५ ते सकाळी ८.३५ वाजेपर्यंत म्हणजेच सव्वाचार तास बंद राहिला, तर मुख्य १२०० मिमी व्यासाच्या जलवाहिनीचा पाणीपुरवठा पहाटे ४.२५ वाजेपासून दुपारी ३.०५ वाजेपर्यंत म्हणजेच १०.४० तास बंद राहिला. त्यामुळे संपूर्ण शहराचा पाणीपुरवठा एक दिवस पुढे गेला आहे.

