

1,896 Anganwadis in the district left in the dark due to lack of electricity
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : वीज बिल भरण्यासाठी निधीची कमतरता भासत असल्याने जिल्ह्यातील अनेक अंगणवाड्या विजेविना चालत आहेत. तब्बल १ हजार ८९६ केंद्रांमध्ये अंधाराचे वातावरण आहे. त्यामुळे सुमारे १ ते १.५ लाख बालकांच्या पूर्वप्राथमिक शिक्षणावर त्याचा परिणाम जाणवत आहे.
जिल्ह्यात एकूण ३ हजार ४२३ अंगणवाड्या कार्यरत आहेत. त्यापैकी २ हजार ६५१ अंगणवाड्या स्वतःच्या इमारतीत, तर ७७२ अंगणवाड्या भाड्याच्या खोल्यांमध्ये सुरू आहेत. मात्र केवळ ७५५ अंगणवाड्यांकडेच वीज कनेक्शन असून, त्यातील ६३३ अंगणवाड्या नियमितपणे वीज बिल भरत आहेत.
उर्वरित अंगणवाड्या निधीअभावी अंधारातच कामकाज करत आहेत. दरम्यान, एकात्मिक बालविकास आयुक्तांकडून प्राप्त पत्रानुसार अंगणवाड्यांना दरमहा ५०० रुपये विद्युत बिलासाठी देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यामुळे काही प्रमाणात दिलासा मिळण्याची शक्यता व्यक्त होत आहे. ग्रामीण भागात या अंगणवाड्यांमार्फत बालकांना पोषण आहार, पूर्वप्राथमिक शिक्षण, तसेच माता व किशोरी मुलींचे समुपदेशन, बालकांचे वजन आणि कुपोषण निर्मूलनाचे कार्य केले जाते. मात्र वीज नसल्यामुळे या सेवांवरही परिणाम होत आहे.
स्मार्ट किटमध्ये अनियमितता
गतवर्षी वितरित करण्यात आलेल्या स्मार्ट किटमध्ये अनियमितता झाल्याचे उघड झाले आहे. डीआरडीएचे निवृत्त प्रकल्प संचालक अशोक सिरसे यांच्या अध्यक्षतेखालील समितीने केलेल्या चौकशीत ही बाब समोर आली असून, अहवाल मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे सादर करण्यात आला आहे. संबंधित तत्कालीन जिल्हा कार्यक्रम अधिकाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे.
ग्रामपंचायतींनी वीज बिल भरण्याची मागणी
विद्यमान जिल्हा कार्यक्रम अधिकारी मंगल पांचाळ यांनी जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांच्या बैठकीत हा मुद्दा उपस्थित करत उर्वरित अंगणवाड्यांना वीज जोडणीसाठी निधी नसल्याचे स्पष्ट केले. तसेच ग्रामपंचायतींनी वीजबिल भरण्याची जबाबदारी घ्यावी, असे निर्देश देण्याची मागणी त्यांनी केली आहे.