

18 gates of Nathsagar will be opened today
पैठण, पुढारी वृत्तसेवा: पैठण येथील नाथसागर धरण ९० टक्के भरल्याने आज गुरुवारी (दि.३१) धरणातील पाण्याचे जलपूजन जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे, आमदार विलासबापू भुमरे यांच्या हस्ते होणार आहे. त्यानंतर दुपारी तीन वाजता धरणाचे १८ दरवाजे ०.५ फुटाने उघडण्यात येणार असून, गोदा वरी नदीत प्रथम ९ हजार ४३२ क्युसेक पाण्याचा कार्यकारी अभियंता यांच्या आदेशावरून विसर्ग सुरू करण्यात येणार असल्याची माहिती धरण शाखा अभियंता मंगेश शेलार यांनी दिली आहे.
गेल्या पाच दिवसांपासून नाथसागर धरणाचे दरवाजे केव्हा उघडणार, अशी चर्चा होत असल्याने अखेर पाटबंधारे विभागाने मुहूर्त काढून आज गुरुवारी दुपारी तीन वाजता राज्याचे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे, आमदार विलासबापू भुमरे यांच्या हस्ते धरणातील पाण्याची जल पूजन करण्यात येणार असून, यावेळी जलसंपदा विभागाचे अधीक्षक अभियंता, कार्यकारी अभियंता प्रशांत संत, जिल्हाधिकारी दिलीप स्वामी, उपविभागीय अधिकारी नीलम बाफना, तहसीलदार ज्योती पवार, नायब तहसीलदार राहुल बनसोडे, प्रभाकर घुगे, नगरपरिषद मुख्याधिकारी डॉ. पल्लवी अंभोरे, पंचायत समिती गटविकास अधिकारी मनोरमा गायकवाड, सहाय्यक गट विकास अधिकारी राजेश कांबळे, पोलिस निरीक्षक महादेव गोमारे यांची प्रमुख उपस्थितीत १८ दरवाजे ०.५ फुटाने खुले करून गोदावरी नदीत ९ हजार ४३२ क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात येणार आहे.
यामुळे गोदावरी नदीच्या परिसरातील गावांतील नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा पाटबंधारे विभागाने दिला आहे. बुधवारी रात्री नऊ वाजेदरम्यान येथील नाथसागर धरणामध्ये १६ हजार २३० क्युसेक पाण्याची आवक सुरू असल्याची नोंद नियंत्रण कक्षात करण्यात आली असून, धरणामध्ये ९०.१३ टक्के पाणी उपलब्ध आहे.