

खुलताबाद : शेततळ्यात साचलेले पाणी पाहण्यासाठी गेलेल्या एका १५ वर्षीय शाळकरी मुलाचा पाय घसरून खोल पाण्यात पडल्याने बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना खुलताबाद तालुक्यातील धामनगाव तांडा येथे सोमवारी (दि. २५) दुपारी घडली. मयूर प्रभू राठोड (१५, रा शाळकरी मुलाचा पाय घसरून खोल पाण्यात पडल्याने बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना खुलताबाद तालुक्यातील धामनगाव तांडा येथे सोमवारी (दि. २५) दुपारी धामनगाव तांडा) असे विद्यार्थ्यांचे नाव आहे.
अवघ्या काही क्षणांच्या निष्काळजीपणामुळे एका निष्पाप विद्यार्थ्यांचा जीव गेल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. मयूर हा अत्यंत शांत, मनमिळावू आणि अभ्यासू स्वभावाचा मुलगा म्हणून गावात ओळखला जात होता. नुकतीच त्याने इयत्ता आठवीची परीक्षा उत्तीर्ण केली होती आणि नववीच्या शिक्षणासाठी तयारी सुरू केली होती. नवीन शैक्षणिक वर्षासाठी वह्या-पुस्तके आणण्याची चर्चा घरात सुरू असतानाच ही घटना घडल्याने राठोड कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
पाणी पाहण्याच्या नादात घडली दुर्घटना
घरी परतत असताना रस्त्यात एका शेतकऱ्याचे शेत लागते. त्या शेतात पावसाचे पाणी साठवण्यासाठी मोठे शेततळे करण्यात आले आहे. उन्हाळ्यातही तळ्यात मोठ्या प्रमाणात पाणी साचलेले असल्याने मयुर आणि त्याच्या मित्रांना ते पाहण्याचा मोह झाला. सर्व मुले शेततळ्याच्या कडेला जाऊन पाणी पाहत उभी होती.
याच वेळी अचानक मयूरचा तोल गेला आणि तो थेट खोल पाण्यात कोसळला. त्याला पोहता येत नसल्याने तो पाण्यात गटांगळ्या खाऊ लागला. मित्रांनी त्याला वाचविण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यांना यश आले नाही. त्यानंतर त्यांनी मोठ्याने आरडाओरड करून मदतीसाठी हाक मारली. मुलांचा आवाज ऐकताच परिसरातील नागरिक आणि शेतकरी घटनास्थळी धावून आले.
गावकऱ्यांनी तातडीने शेततळ्यात उतरून मयूरचा शोध घेतला. काही वेळाने त्याला पाण्याबाहेर काढण्यात आले. त्या वेळी तो बेशुद्धावस्थेत होता. त्याला तातडीने खुलताबाद येथील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी हलविण्यात आले. मात्र रुग्णालयात दाखल केल्यानंतर वैद्यकीय अधिकारी डॉ. वंदना गायसमुद्रे यांनी तपासणी करून मृत्यू झाल्याचे घोषित केले. ही बातमी समजताच रुग्णालय परिसरात एकच आक्रोश पसरला. आई-वडिलांनी केलेला आक्रोश पाहून उपस्थितांच्याही डोळ्यात अश्रू आले.
मित्रांसोबत गेला होता डोंगर परिसरात
मिळालेल्या माहितीनुसार, सोमवारी दुपारी दोन वाजेच्या सुमारास मयूर हा आपल्या चार ते पाच मित्रांसोबत गावालगतच्या डोंगर परिसरात करूंदे हा रानमेवा खाण्यासाठी गेला होता. उन्हाळ्याच्या सुट्टीमुळे सर्व मुले खेळण्यासाठी आणि फिरण्यासाठी डोंगर भागात गेली होती. त्याच परिसरात मयुरचे आजोबा देवू राठोड हे बकऱ्या चारण्यासाठी गेले होते. दुपार होत आल्याने आणि उन्हाचा कडाका वाढल्यामुळे आजोबा देवू राठोड यांनी नातवाला आणि त्याच्या मित्रांना घरी परत जाण्याचा सल्ला दिला. आजोबांचे ऐकून मयुर आपल्या मित्रांसोबत डोंगरावरून खाली उतरून घराच्या दिशेने निघाला.