बीड : मराठा आरक्षणासाठी उभारलेला लढा दहा महिन्यानंतरही कायम आहे. या दहा महिन्यात सरकारने मला अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला, परंतु त्यांच्या प्रत्येक डावाला मी उत्तर दिले. आता ते काही समन्वयकांच्या माध्यामातून मला अडचणीत आणू पाहत आहेत. पण लक्षात ठेवा गाठ मराठ्यांशी आहे. मराठा समाजाचे मला आशिर्वाद आहेत. त्यांच्या लेकरांचे कल्याण करण्यासाठी मी लढा देत आहे. समाजाला एक इंचही मी मागे हटणार नाही. सरकारने वेदना समजून घ्याव्यात अन्यथा विधानसभेत मी नावे घेवून पाडणार असल्याचाही इशारा मनोज जरांगे पाटील यांनी दिला.
मनोज जरांगे-पाटील यांच्या उपस्थितीत बीडमध्ये मराठा शांतता रॅली व जनसंवाद सभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी जरांगे पाटील म्हणाले, आजची गर्दी पाहून मला शब्दही सुचत नाहीत. बीड जिल्ह्यातील मराठ्यांनी नाव काढले. आजवरच्या सर्व रॅलीचे रेकॉर्ड तोडत बीड जिल्ह्याने सर्वांची हवा टाईट केली आहे. इथे असलेली गर्दी फडणवीस आणि शिंदेंनी पहावी. मराठा समाजाच्या वेदना समजून घ्याव्यात. आम्ही जातीवाद होऊ देणार नाही. छगन भुजबळ यांच्या मनात दंगली घडवण्याचा डाव आहे. पण तो यशस्वी होऊ देणार नाही. ज्या मराठा समाज बांधवांच्या नोंदी सापडल्या आहेत, त्याच्या आधारे कुणबी प्रमाणपत्र सर्व मराठा समाजबांधवांना द्यायचं ठरलं होतं. पण गिरीश महाजन डाव टाकत आहेत. ते ज्या आंदोलनाला भेट देतात, ते आंदोलन बंद पडते. पण मी त्यांच्या पुढचा आहे. मला त्यांचे डाव कळतात. मी मराठा समाजाशी प्रामाणिक आहे, मराठा समाजाला आरक्षण मिळवूनच देण्याचा निर्धार मनोज जरांगे पाटील यांनी यावेळी व्यक्त केला. बीडमधील मराठा शांतता रॅलीस लाखोच्या संख्येने मराठा समाज बांधव उपस्थित होते.