पुढारी ऑनलाईन डेस्क : बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या आणि खंडणी प्रकरणात (Santosh Deshmukh Murder case) वाल्मीक कराड (Walmik Karad) याला २२ जानेवारीपर्यंत ७ दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली. एसआयटीकडून वाल्मीक कराडची १० दिवसांच्या कोठडीची मागणी करण्यात आली होती.
बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या आणि खंडणी (Santosh Deshmukh Murder case) प्रकरणात वाल्मीक कराड (Walmik Karad) याला मंगळवारी 'मोका' लावण्यात आला. त्यानंतर बुधवारी त्याला पुन्हा बीड सत्र न्यायालयात हजर करण्यात आले. संतोष देशमुख यांची ९ डिसेंबर रोजी निर्घृण हत्या झाली होती. या घटनेबाबत एसआयटीने न्यायालयात महत्त्वाची माहिती दिली. ज्या दिवशी हत्या झाली त्याच दिवशी कराडने संतोष देशमुख यांना धमकी दिली होती. आरोपींनी कट रचून संतोष देशमुख यांचे अपहरण केले आणि त्यांची हत्या केली. कराडचे सुदर्शन घुले, सुधीर सांगळे यांच्यात संभाषण झाले होते, असा दावा एसआयटीकडून (SIT) न्यायालयात करण्यात आला. दरम्यान, कराडवर मोका का लावला? यासाठी त्याच्यावरील गुन्ह्यांची यादी पोलिसांकडून न्यायालयात सादर करण्यात आली.
वाल्मीक कराड यांचे संभाषण आणि संतोष देशमुख यांच्या अपहरणाची वेळ मिळतीजुळती आहे, असे सांगत एसआयटीकडून वाल्मीक कराडची १० दिवसांच्या कोठडीची मागणी करण्यात आली. तपासदरम्यान मिळालेल्या पुराव्यांची शहानिशा करायची आहे. तसेच विष्णू चाटे, सुदर्शन घुले आणि वाल्मिक कराड यांना समोरासमोर बसवून चौकशी करायची आहे. तसेच संशयित आरोपी कृष्णा आंधळे अद्याप फरार आहे. त्याचा शोध घ्यायचा आहे. त्यासाठी कराड याची कोठडी हवी असल्याचा दावा एसआयटीने केला. वाल्मीक कराडची देश-विदेशात मालमत्ता आहे का? याचा शोध घ्यायचा असल्याचे एसआयटीकडून सांगण्यात आले.
एखाद्याला फोन कॉल केला म्हणजे आरोपी होऊ शकतो का? खंडणी आणि खून प्रकरणात आरोपी कसे काय केले? या एकाच प्रश्नावर दोन्ही बाजूने २५ मिनिटे युक्तिवाद झाला.