

The mystery of Mahadev Munde's murder remains even after eighteen months
बीड, पुढारी वृत्तसेवा :
परळीतील व्यापारी तथा पिग्मी एजंट महादेव मुंडे यांची २१ ऑक्टोबर २०२३ मध्ये तहसील कार्यालयासमोरील मैदानात रात्रीच्या वेळी हत्या झाली होती. या प्रकरणी शहर पोलिस ठाण्यात गुन्हा देखील दाखल करण्यात आला होता. परंतु आज अठरा महिन्यांनंतरही या खून प्रकरणाचे गूढ कायम आहे.
गंभीर बाब म्हणजे या प्रकरणात आतापर्यंत आठ तपास अधिकारी बदलले मात्र खुनाचा तपासच लागत नसल्याने मयत महादेव मुंडे यांच्या पत्नी ज्ञानेश्वरी मुंडे यांनी विष प्राशन करत आत्महत्येचा प्रयत्न केल्यानंतर आता या प्रकरणात तपासाला गती मिळेल, अशी शक्यता वाटत आहे. महादेव मुंडे हे परळीत व्यापार, पिग्मी एजंटबरोबरच प्लॉटिंगचा देखील व्यवसाय करत होते. त्यांची हत्या २१ ऑक्टोबर २०२३ मध्ये झाली. त्या आधी त्यांनी काही मोक्याच्या ठिकाणचे प्लॉट खरेदी केले होते.
त्यावरून काहीजणांशी त्यांचे मतभेद देखील झाल्याचे कुटुंबीयांनी वेळोवेळी सांगितले होते. महादेव मुंडे यांचा खून झाल्यानंतर शहर पोलिसांत गुन्हा दाखल होताच तपास सुरू झाला. परंतु तो योग्य दिशेने तपास होऊ शकला नाही. यामागे पोलिसांचे जाणीवपूर्वक दुर्लक्ष होते का? पोलिसांवर कोणाचा दबाव होता का? पोलिस खरोखरच आरोपीपर्यंत पोहचू शकले नाहीत का? आतापर्यंत नियुक्त झालेल्या तपास अधिकाऱ्यांनी नेमका काय तपास केला? असे प्रश्न उपस्थित केले जात असून याची उत्तरे मिळणार कधी? असा प्रश्न अजूनही कायम आहे.
ज्ञानेश्वरी मुंडे यांच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू असून आता प्रकृतीत सुधारणा होत आहे. परंतु महिनाभरात या प्रकरणातील आरोपी अटक झाले नाही तर पोलिस अधीक्षक कार्यालयासमोरच विष प्राशन करून आत्महत्या करेन, असा थेट इशाराच त्यांनी दिला आहे. तूर्तास हा तपास स्थानिक गुन्हे शाखेकडे देण्यात आला.
या प्रकरणात बाळा बांगर म्हणाले की, महादेव मुंडे यांचा खून करून आरोपींनी त्यांचे मांस वाल्मीक कराडच्या टेबलवर ठेवले होते, वाल्मीक कराडसह त्याचा मुलाचा खूनात सहभाग असल्याचा दावा बांगर यांनी केला. आठ पानांचा जवाबदेखील नोंदवला आहे.
गुन्हा दाखल झाल्यानंतर प्रारंभी तपास करणाऱ्या अधिकारी, कर्मचाऱ्यांवर आता संशय व्यक्त केला जात आहे. त्या सर्वांनी या प्रकरणात गांभीर्याने तपास केला का? असा प्रश्न उपस्थित करत त्या सर्वांची चौकशी केल्यास यातील मुख्य आरोपींची नावे समोर येऊ शकतील,
कोणत्याही खून प्रकरणात घटना घडल्यापासून पहिले ७२ तास अतिशय महत्त्वाचे असतात. या प्रकरणात गतीने पावले उचत तपास होणे गरजेचे असते. परंतु महादेव मुंडे यांच्या खून प्रकरणात असा गतीने तपास होऊ शकला नाही.
माझ्या पतीच्या हत्या प्रकरणाचा तपास होत नाही. आम्ही गरीब आहोत, आमच्या बाजूने बोलणारे कोणी नाही म्हणून तपास होत नाही. माझ्या मुलांमध्ये बदल्याची भावना वाढत आहे, त्यांच्या जीवाचे काही बरेवाईट झाले तर? त्यांच्या हातून काही गुन्हा घडला तर त्याला जबाबदार कोण? मग अशा स्थितीत माझा जिवंत राहून काय उपयोग? असा उद्विग्र सवाल ज्ञानेश्वरी मुंडे यांनी केला आहे.
वाल्मीक कराडचा एकेकाळचा सहकारी बाळा बांगर यानेच आता गंभीर आरोप केले आहेत. मारेकऱ्यांनी महादेव मुंडेंचे मांस वाल्मीकच्या टेबलवर ठेवले होते. त्या प्रकरणात जवाब नोंदवून देखील तपास केला जात नाही, ज्या अधिकाऱ्याची नियुक्तीच आकाने केली होती, त्याच्याकडे तपास दिला होता. काय तपास करणार आहेत असे अधिकारी? संपूर्ण परळीला आरोपी माहीत आहेत, पोलिसांनी त्यांना अटक करावी, अशी मागणी देखील आ. सुरेश धस यांनी केली.