

अंबाजोगाई : राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा महत्वकांक्षी प्रोजेक्ट म्हणून ओळखला जाणारा नागपूर गोवा शक्तिपीठ महामार्गास अंबाजोगाई तसेच परळी तालुक्यातील शेतकऱ्यांनी तीव्र विरोध दर्शवत आज चक्का जाम आंदोलन केले. यावेळी तालुक्यातील अनेक शेतकरी या आंदोलनात सहभागी झाले होते.
शेतकऱ्यांना देशोधडीला लावणाऱ्या शक्तिपीठ महामार्गास शेतकऱ्यांचा कडाडून विरोध होत असून राज्य सरकारने हा प्रस्तावित महामार्ग तात्काळ रद्द करावा यासाठी राज्यातील शेतकऱ्यांसह बीड जिल्ह्यातील परळी, अंबाजोगाई तालुक्यातील प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष बाधित शेतकऱ्यांनी मंगळवार दि 1 रोजी कृषिदिनी अनेक ठिकाणी रास्तारोको करून या महामार्गास तीव्र विरोध केला. अंबाजोगाई तालुक्यातील बर्दापुर, धायगुडा पिंपळा या ठिकाणी शेतकरी महिला आणि त्यांचे कुटूंबीय एकत्र येत रास्ता रोको करत शासनाचा निषेध करत या महामार्गाला विरोध केला.
राज्यात शेतकऱ्यांना खोटी प्रलोभने व पोलीस बाळाची भीती दाखवत सीमांकन करण्याच्या प्रयत्न शासन व प्रशासन करत असून शेतकरी आता या गोष्टीला बळी न पडता शक्तीपीठ महामार्ग विरोधात एकवटला आहे. याचाच भाग म्हणून जिल्ह्यातील अंबाजोगाई तालुक्यातील ज्या गाव शिवारातून हा महामार्ग प्रस्तावित असून या महामार्गामुळे प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष बाधित अबाल वृद्ध शेतकरी आणि महिला यांनी बीड जिल्हा किसान सभेच्या नेतृत्वाखाली एकत्र येत अनेक ठिकाणी रास्ता रोको केला.
धायगुडा पिंपळा या ठिकाणी आंदोलन करणाऱ्या शेतकरी पुरुष महिलांना अटक करून दुपारी सोडण्यात आले. किसान सभेचे ऍड.अजय बुरांडे, कॉ.मुरलीधर नागरगोजे, भाई मोहन गुंड कॉ.भगवान बडे, कॉ.मदन वाघमारे व्यंकट ढाकणे, सुशील शिंदे, मारुती इरलापल्ले, एड.जावेद पटेल, दीपक शिंदे, अरुण पाटील, पुंडलिक धायगुडे, बावणे विठ्ठल, मीनाताई डांगे, आशाबाई पवार, भानुदास मुंडे, मारुती डांगे यांच्या प्रमुख उपस्थितीत शेकडो शेतकरी या ठिकाणी रास्तारोको मध्ये सहभागी झाले होते. यावेळी उपस्थित शेतकऱ्यांनी जमीन आमच्या हक्काची नाही कुणाच्या बापाची , राज्य सरकार हाय हाय, शेतकरी विरोधी सरकारचा निषेध असो या घोषणांनी परिसर दणाणून सोडला होता.
सरकार शेतकरी विरोधी भूमिका घेत असून शेतकऱ्यांना भूमिहीन करून देशोधडीला लावणारा शक्तीपीठ महामार्गाच्या सीमांकन आणि जमीन संपादन करण्यासाठी सरकार पोलिसी बळाचा वापर करत आहे. अधिकारी देखील शेतकऱ्यांना धमक्या देण्याचा प्रकार बीड जिल्ह्यात सुरू असून सरकारच्या ह्या सर्व दडपशाही विरोधात बीड जिल्ह्यातील शेतकरी पेटून उठला असून सत्ताधारी जर सत्तेचा आणि बळाचा गैरवापर करत असतील तर हे आंदोलन यापेक्षा अधिक तीव्र स्वरूप घेईल.
एड.अजय बुरांडे, किसान सभा, बीड