

Shaktipith Highway Farmers Protest
शिरोली एमआयडीसी: शक्तिपीठ महामार्गाच्या विरोधात आज (दि. १) सर्व पक्षीय संघटनेच्या वतीने पुणे - बेंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर पुलाची शिरोली येथील पंचगंगा नदी पुलाजवळ सुमारे दोन तास महामार्ग रोखून धरला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना हा शक्तीपीठ महामार्ग रद्द करण्यासाठी पांडुरंग सुबुद्धी देवो, यासाठी ५ जुलैरोजी पंढरपुरात जावून पांडुरंगाला साकडं घालण्याचा निर्णय घेण्यात आला. यावेळी राजू शेट्टीसह माजी आमदार ऋतुराज पाटील, विजय देवणे याच्यासह अनेकांना पोलिसांनी ताब्यात घेऊन सोडण्यात आले.
फडणवीस सरकारने राज्यातील 12 जिल्ह्यातून जाणाऱ्या शक्तीपीठ महामार्गाचा प्रस्ताव आणला आहे. या महामार्गाला सर्वच जिल्ह्यातून बाधीत शेतकऱ्यांचा विरोध होत असून सत्तेतील काही मंत्री, आमदार, खासदार यांनीही विरोध दर्शवीला आहे. कोल्हापूर जिल्ह्यामध्ये सध्या अस्तित्वात असलेल्या महामार्ग व पुलांमुळे अनेक गावांना पुराचा फटका आहे. त्याच बरोबर शेकडो हेक्टर शेतीतील पिके उद्ध्वस्त होत आहे. यामुळे या परिसरातील शेतकरी अडचणीत सापडला आहे. या शक्तिपीठ महामार्गामुळे उर्वरीत काही गावासह कोल्हापूर शहरातील मध्यवर्ती भागालाही महापुराचा फटका बसणार आहे. त्याच बरोबर बागायती शेतीचेही प्रचंड नुकसान होणार आहे . तर हे सरकार पोलिस यंत्रणेचा वापर करून जमीन मोजणी करण्याचा घाट घालत आहे.
भविष्यात निर्माण होणाऱ्या आपत्ती पासून बचावासाठी शक्तीपीठ महामार्ग रद्द झालाच पाहीजे . यासाठीच सरकार विरोधात सर्व पक्षीय संघटनेच्या वतीने प्रस्तावित बाराही जिल्ह्यामध्ये चक्काजाम आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला होता. त्याचाच एक भाग म्हणून पुणे - बेंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर पुलाची शिरोली पंचगंगा नदी पुलाजवळ चक्काजाम आंदोलन करून सुमारे दोन तास रस्ता रोको करण्यात आला.
यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे माजी खासदार राजू शेट्टी , शिवसेनेचे विजय देवणे , संजय पवार , रवी इंगवले , सचिन चव्हाण , माजी आमदार ऋतुराज पाटील , माजी आमदार राजूबाबा आवळे बाबासाहेब देवकर , रघुनाथ कांबळे , संदिप देसाई , राहूल देसाई , यानी आपली मनोगत व्यक्त केली.
जिल्हा पोलिस प्रमुख योगेश कुमार गुप्ता याच्या उपस्थितीमध्ये एक अप्पर पोलिस अधीक्षक, दोन विभागीय पोलिस अधिकारी, पंधरा पोलिस निरीक्षक, दोन टास्क फोर्स , आपत्ती व्यवस्थापनाच्या दोन बोटी सह दोनशेहून अधिक पोलिस कर्मचारी तैनात होते. तर महसुल विभागाच्या वतीने प्रांताधिकारी दीपक शिंदे, तहसीलदार सुशीलकुमार बेल्हेकर, शिरोली मंडल अधिकारी सीमा मोरये, तलाठी महेश सुर्यवंशी याच्यासह महसुल कर्मचारी उपस्थित होते.
महामार्गावर आंदोलन सुरू असतानाच बाधीत शेतकरी अजित पवार , बंडू पाटील , कलगौंडा पाटील, आणि तानाजी वाठारे यांनी जल समाधी घेण्यासाठी पंचंगंगा नदी पुलाकडे धाव घेतली. आमच्या पिकाऊ जमिनी जर या रस्त्यात गेल्या तर आमचे कुटुंब उद्ध्वस्त होणार आहे. मग जगून काय उपयोग? असा आक्रोश करत पुलावर चढून जलसमाधी घेण्याचा प्रयत्न केला.
आंदोलन करणाऱ्या या शेतकऱ्यांना पोलिसांनी रोखून धरत त्यांना जलसमाधी घेण्यापासून परावृत्त केले. संभाव्य धोका होऊ नये, म्हणून पंचगंगा नदी पात्रात आपत्ती व्यवस्थापनाच्या दोन बोटी तैनात करण्यात आल्या होत्या .