

बीड : कर्नाटकातील सदाशिव साखर कारखान्यात विहिरीत पडून धर्मा साहेबराव कांबळे (रा.गेवराई) यांचा मृत्यू झाला होता. कांबळे हे ऊस वाहतूक करणाऱ्या वाहनावर चालक म्हणून कार्यरत होते. त्यांच्या कुटुंबाला अखेर दिलासा मिळाला आहे. पशुसंवर्धन मंत्री तथा जालना जिल्ह्याच्या पालकमंत्री पंकजा मुंडे यांनी स्वतः पुढाकार घेत तातडीने मदतीचे जिल्हा प्रशासनाला आदेश दिले.
7 मार्च 2026 रोजी कर्नाटकातील अलमट्टी परिसरातील सदाशिव शुगर येथे धर्मा कांबळे यांचा विहिरीत पडून मृत्यू झाला होता. मात्र दोन दिवस उलटूनही मृतदेह बाहेर काढण्यात आला नव्हता. यामुळे कुटुंबीयांमध्ये संताप आणि हतबलता निर्माण झाली होती. या घटनेची लखन थोरात यांनी माहिती मिळताच स्व.गोपीनाथराव मुंडे, ऊसतोड कामगार संघटनेचे अध्यक्ष कृष्णा तिडके यांनी तातडीने कारखाना प्रशासनाशी संपर्क साधत कठोर भूमिका घेतली.
त्यांच्या हस्तक्षेपानंतर प्रशासनाने घटनास्थळी जाऊन मृतदेह बाहेर काढला, पंचनामा करून पोस्टमार्टमसाठी पाठवला व ॲम्ब्युलन्सद्वारे मृतदेह गेवराई येथे पाठविण्यात आला. दरम्यान, धर्मा कांबळे यांच्या पश्चात पत्नी मीरा कांबळे, मुलगी सुप्रिया कांबळे, प्रिया कांबळे, श्रेया कांबळे, शुभांगी कांबळे, वेदिका कांबळे या पाच मुली असा मोठा परिवार उघड्यावर आला आहे. कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून, राहण्यासाठी घरही नसल्याची बाब समोर आली आहे.
ही बाब लक्षात येताच कृष्णा तिडके यांनी कांबळे कुटुंबाची व पंकजा मुंडे यांची भेट करून दिली. मंत्री पंकजा मुंडे यांनी तातडीने गेवराई नगरपालिकेतील नेते बाळराजे पवार यांना दूरध्वनीवरून सूचना देत मीरा कांबळे यांना आपत्कालीन स्वरूपात नोकरी देण्याचे व कुटुंबासाठी घराची व्यवस्था करण्याचे आदेश दिले. तसेच कारखान्याकडून व ऊसतोड समाज कल्याण महामंडळामार्फत आर्थिक मदत मिळवून देण्याबाबतही प्रयत्न सुरू असल्याचे कृष्णा तिडके यांनी सांगितले. या कठीण प्रसंगी आम्ही कुटुंबासोबत आहोत, असा दिलासाही त्यांनी दिला.