

बीड ः शेवगाव तालुक्यात माझी वसुंधरा अभियान गुणांकनात गैरप्रकार झाल्याचा आरोप करत तेथील ग्रामस्थांनी बीडमधील अधिकाऱ्यांविरोधात शुक्रवारी आंदोलन केले. यावेळी ग्रामस्थांनी जिल्हा परिषदेच्या गेटसमोर रेडा बांधून जोरदार घोषणाबाजी केली.
केज पंचायत समितीचे गटविकास अधिकारी विठ्ठल नागरगोजे हे अहिल्यानगर जिल्ह्यात शेवगाव तालुक्यातील वाघोली या गावात माझी वसुंधरा अभियान पाहणीसाठी गेले होते. हे गाव यापूर्वी विविध अभियानात प्रथम आलेले आहे. परंतु यावेळी मात्र दुसऱ्याच गावाने हा पुरस्कार पटकावला.
यामुळे गुणांकनात गैरप्रकार झाल्याचा आरोप या ठिकाणच्या ग्रामस्थांनी केला. या प्रकरणात नागरगोजे यांच्यावर कारवाई करावी या मागणीसाठी या ग्रामस्थांनी शुक्रवारी सकाळी आंदोलन केले. यावेळी आंदोलकांनी चक्क रेडादेखील सोबत आणला होता. आंदोलकांनी आपल्या मागण्यांचे निवेदन प्रशासनास सादर केले आहे.
आंदोलकांच्या तत्परतेची चर्चा!
अहिल्यानगर जिल्ह्यातील वाघोली गावाच्या तपासणीत काही गैरप्रकार झाला असेल तर त्या गावकऱ्यांनी अहिल्यानगर जिल्हा परिषदेसमोर आंदोलन करणे अपेक्षित होते. परंतु त्याऐवजी ते थेट बीडपर्यंत पोहचले. माझी वसुंधरा अभियान तपासणी समितीमध्ये शेवगाव तालुक्याच्या बीडीआेंसह आणखी चार अधिकारी होते, परंतु आरोप बीडच्याच अधिकाऱ्यांवर केला जात आहे. अहिल्यानगर सोडून थेट बीड जिल्हा परिषद कार्यालयासमोर आंदोलन करण्याची तत्परता या ग्रामस्थांनी दाखवल्यामुळे याची मोठी चर्चा होत आहे. तसेच माझी वसुंधरा या अभियानात स्वयंमूल्यांकन करावयाचे असते, त्याकरिता संबंधित ग्रामपंचायतने ऑनलाईन माहिती भरावी लागते, त्यांनी भरलेल्या माहितीनुसारच मूल्यांकन होत असते, मग संबंधितांनी काय माहिती दिली होती? हा प्रश्नच आहे.