

उदय नागरगोजे
बीड ः लोकनेते गोपीनाथ मुंडे ऊसतोड कामगार कल्याण महामंडळाचे कार्यालय नव्या वर्षात संभाजीनगरला हलवण्यात आले आहे. प्रशासकीय सोयीसाठी हा निर्णय घेतला जात असल्याचे सांगितले जात असले तरी प्रत्यक्षात ज्या ऊसतोड कामगारांसाठी हे महामंडळ कार्यान्वित केले गेले, त्यांना मात्र आता योजनांचा लाभ मिळण्यासाठी आणि प्रकरणाच्या पाठपुराव्यासाठी छत्रपती संभाजीनगरला जावे लागणार आहे. गंभीर बाब म्हणजे या सर्व प्रकारावर ऊसतोड मजूर कामगार संघटना मात्र गप्प आहेत.
बीडसह शेजारच्या जिल्ह्यातून लाखो ऊसतोड मजूर पश्चिम महाराष्ट्र आणि परराज्यात ऊसतोडीसाठी जातात. या ऊसतोड मजुरांसाठी महामंडळ स्थापन व्हावे याकरिता मंत्री पंकजा मुंडे, आ.धनंजय मुंडे यांनी पाठपुरावा केला होता. यानंतरच्या काळात हे महामंडळ स्थापन झाले तरी अद्याप ऊसतोड मजुरांना याचा फ ारसा लाभ होत नसल्याचे दिसते. प्रारंभी हे कार्यालय स्व.गोपीनाथ मुंडे यांचा मतदारसंघ असलेल्या परळीतच कार्यरत व्हावे असे जाहीर करण्यात आले. त्याप्रमाणे कार्यालय कार्यान्वित देखील झाले, परंतु त्या ठिकाणाहून किती ऊसतोड कामगारांना लाभ मिळाला हा प्रश्न कायम आहे.
यादरम्यानच आता प्रशासकीय सोयीसाठी परळीतील हे कार्यालय संभाजीनगरला स्थलांतरित करण्यात आले आहे. या कार्यालयासाठी आऊटसोर्सिंगच्या माध्यमातून एक कार्यालयीन सहाय्यक, एक वरिष्ठ लिपिक, एक कनिष्ठ लिपिक व शिपाई या पदांची नियुक्ती बाह्यस्रोत तत्त्वावर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
या निर्णयामुळे सामाजिक न्याय विभागाला प्रशासकीय कामकाज सोयीचे जाणार असले तरी ऊसतोड कामागरांना मात्र अडचणींना सामोरे जावे लागणार आहे. कारण एखाद्या योजनेचा लाभ मिळण्यासाठी त्याचा प्रस्ताव सादर करणे, पाठपुरावा करणे याकरिता परळी किंवा बीड येथील कार्यालय सोयीचे ठरले असते तसेच शेजारच्या परभणी, अहिल्यानगर, धाराशिव, लातूर या जिल्ह्यातून देखील बीड हे मध्यवर्ती ठिकाण ठरते. असे असतांना देखील हे कार्यालय संभाजीनगरला हलवण्यात आले आहे. आता त्या ठिकाणी जाण्या-येण्याचा आर्थिक भुर्दंड ऊसतोड मजुराना सहन करावा लागणार आहे, तसेच पोटाची खळगी भरण्यासाठी परजिल्ह्यात जाणाऱ्या मजुरांना हा पाठपुरावा करणे शक्य होईल का, हाही प्रश्नच आहे.
ऊसतोड कामगार संघटना आवाज उठवणार का?
ऊसतोड कामगार महामंडळ स्थापन व्हावे, त्यासाठीचे लाभ दिले जावे याकरिता ऊसतोड कामगार संघटना आक्रमक होत्या. मंत्री पंकजा मुंडे, आ.धनंजय मुंडे यांनीही यासाठी पाठपुरावा केला होता. सरकारमधील वरिष्ठ नेत्यांनी देखील याबाबतचे आश्वासन दिले होते, त्यानुसार महामंडळ स्थापन झाले, कार्यान्वित झाले. परंतु आता परळीचे कार्यालय संभाजीनगरला हलवण्यात आल्याने ऊसतोड कामगारांना अडचणींना सामोरे जावे लागणार असून यावर ऊसतोड कामगार संघटना आवाज उठवणार का, हे कार्यालय पुन्हा बीड किंवा परळीत कार्यान्वित व्हावे याकरिता आंदोलन करणार का? असा प्रश्न उपस्थित होत आहे.