

Maratha brothers leave for reservation fight
बीड, पुढारी वृत्तसेवा: मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी सुरू असलेल्या आंदोलनाला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे बीड विधानसभा अध्यक्ष डॉ. योगेश क्षीरसागर यांनी सक्रिय पाठिंबा दिला आहे. बुधवारी (दि. २७) त्यांनी अंतरवली सराटी येथे जाऊन मराठा आर क्षणासाठी लढा देणारे आंदोलक मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली. दरम्यान, जिल्ह्याच्या विविध तालुक्यातून, ग्रामीण भागातून हजारो मराठा समाज बांधव मुंबईकडे रवाना झाले आहेत.
मनोज जरांगे पाटील हे मराठा आर क्षणाच्या मागणीसाठी मुंबईकडे प्रस्थान करत आहेत. त्याआधी अंतरवली सराटी येथे भेटीदरम्यान डॉ. क्षीरसागर यांनी आंदोलना सोबत राहण्याची ग्वाही दिली. गरजवंत मराठा समाजाच्या हकाच्या लढ्यात सक्रिय सहभाग नोंदवून त्यांनी आपला ठाम पाठिंबा व्यक्त केला. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
डॉ. योगेश क्षीरसागर यांचा कायम सहभाग समाजकारण, राजकारणात सक्रिय झाल्यानंतर डॉ. योगेश क्षीरसागर यांनी मराठा आरक्षणासाठी सातत्याने आवाज उठवला आहे. पहिल्यांदा दि. ८ मार्च २०१८ रोजी बीडमध्ये झालेल्या जनसुनावणीत महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाचे सदस्य सचिव डॉ. लिमसे यांना स्वतः निवेदन देऊन आरक्षणाची मागणी केली. याशिवाय, मनोज जरांगे पाटील यांच्या विविध बैठका, आंदोलनाशी संबंधित कार्यक्रमात ते नेहमीच उपस्थित राहून सक्रिय सहभाग नोंदवत आहेत.
आष्टी आष्टी तालुक्यातील गहखेल गावाने मराठा आरक्षणाच्या लढ्यासाठी संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला ठाम पाठिंबा दिला आहे. गावातील शेकडो युवक एक मराठा लाख मराठाच्या घोषणांसह २७ ऑगस्ट रोजी मुंबईच्या आझाद मैदानावरील उपोषणासाठी रवाना झाले. या गावात सर्व जाती धर्मीय लोक राहतात. मात्र आरक्षणाच्या लढ्यासाठी जातपात बाजूला सारून सर्वांनी एकत्र येत आंदोलनकर्त्यांना शुभेच्छा दिल्या. गावातील सरपंच मल्हारी शिंदे यांच्यासह अनेक मान्यवर व नागरिक उपस्थित राहून कार्यकर्त्यांना निरोप दिला. गहुखेल गाबाने दाखवलेली ही एकजूट समाजातील सर्वधर्मसमभावाचे जिवंत उदाहरण ठरली आहे.
धारूर : मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळावे, रखडलेली प्रमाणपत्रे तातडीने वाटप करावीत व आंदोलकांवरील गुन्हे मागे घ्यावेत या प्रमुख मागण्यांसाठी संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांनी दिलेल्या चलो मुंबई च्या हाकेला धारूर तालुक्यातून हजारो मराठा सेवकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आहे. गाव, वाडी, वस्ती आणि शहरातील कार्यकर्ते सकाळपासूनच मोठ्या संख्येने मुंबईकडे रवाना झाले. येत्या २९ ऑगस्ट रोजी आझाद मैदानावर होणाऱ्या या आंदोलनात धारूर तालुक्याचा भक्कम सहभाग असणार आहे. मागील दोन वर्षांपासून जरांगे पाटील आर-क्षणाच्या प्रश्नावर विविध आंदोलन करत असून, सरकारकडून केवळ वेळकाढूपणा होत असल्याचा आरोप आहे. यामुळे मराठा सेवकांमध्ये प्रचंड संताप असून, धारुर तालुक्यातून निघालेला मोठा जनसमुदाय हेच या लढ्याचे प्रत्यंतर ठरत आहे.
गेवराईतून मराठा आरक्षणासाठी उसळला जनसागर गेवराई :
मराठा आरक्षणासाठी गेवराई तालुक्यातील गावखेड्यांतून आज पुन्हा एकदा एल्गार उसळला, पहाटेपासून ट्रॅक्टर, जीप, टेम्पो, दुचाकी आणि चारचाकी वाहनांचे ताफे आंतरवली सराटी कडे रवाना झाले. एक मराठा, लाख मराठा आता माघार नाही अशा घोषणांनी रस्ते दणाणून गेले. या लढ्यात युवक, महिला, लहान मुले आणि ज्येष्ठ नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग होता.
महिलांनी हातात तांब्या-भांडी घेऊन घोषणाबाजी केली, तर लहान मुलांनी शालेय गणवेशातच आम्हाला हक द्या अशी मागणी केली. गावागावांतून निघालेल्या ताफ्यांमुळे तालुक्यातील मुख्य रस्ते दिवसभर गजबजले. मोठ्या जनलाटेमुळे गेवराई, चकलांबा आणि तलवाडा पोलिसांनी ठिकठिकाणी बंदोबस्त ठेवला होता. काही ठिकाणी वाहनांच्या ताफ्यांमुळे वाहतूक कोंडी झाली. आंतरवली सराटी हे आंदोलनाचे केंद्र ठरत असून, याठिकाणी होणाऱ्या सभेमधून आंदोलनाची दिशा निश्चित केली जाणार आहे. आरक्षण मिळाल्याशिवाय मागे हटणार नाही असा ठाम निर्धार मराठा बांधवांनी व्यक्त केला आहे.