

Lineman ends his life over a land dispute in Georai, Beed district
गेवराई, पुढारी वृत्तसेवा : बीड जिल्ह्यातील गेवराई शहराजवळ घराच्या जागेच्या वादातून वारंवार धमक्या देऊन तसेच खोटा गुन्हा दाखल करून नोकरी घालविण्याची धमकी देत मानसिक त्रास दिल्याने एका ४५ वर्षीय लाईनमनने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. दिलीप गणपत चव्हाण (वय ४५, रा. तुका नाईक तांडा, खांडवी, ता. गेवराई, जि. बीड) असे मृत लाईनमनचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, घराच्या जागेवरून झालेल्या वादातून आरोपींकडून दिलीप चव्हाण यांना सातत्याने धमक्या दिल्या जात होत्या. "खोटा गुन्हा दाखल करून तुझी नोकरी घालवतो, आमची जागा सोड, आमच्या नादी लागू नको," अशा शब्दांत धमकावून त्यांना मानसिक त्रास दिला जात होता, असा आरोप फिर्यादीत करण्यात आला आहे.
या सततच्या त्रासाला कंटाळून १४ ऑगस्ट रोजी सकाळी ७ ते सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या दरम्यान गेवराई-जातेगाव रोडवरील माधव जिनिंगच्या पाठीमागे एका लिंबाच्या झाडाला गळफास घेऊन दिलीप चव्हाण यांनी आत्महत्या केली.
पत्नीच्या फिर्यादीवरून ८ जणांवर गुन्हा दाखल
या प्रकरणी मृताची पत्नी कविता दिलीप चव्हाण यांच्या फिर्यादीवरून १५ ऑगस्ट रोजी गेवराई पोलिस ठाण्यात रघुनाथ नंदू चव्हाण, चांदाबाई रघुनाथ चव्हाण, रविंद्र नागू राठोड, कविता राजू राठोड, रामभाऊ आलू राठोड, विजय नागू राठोड, बाळू शंकर राठोड तसेच अन्य एक अशा एकूण आठ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक शिंगणे करीत आहेत.