

Khej Police Action
गौतम बचुटे
केज : राज्यात उपमुख्यमंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून अजित पवार यांच्यासारखा दमदार नेता मिळाल्यानंतर, जिल्ह्यातील अवैध धंदे, चोरटी वाळू वाहतूक, गुटखा-मटका यांना आळा बसेल, अशी अपेक्षा नागरिकांनी व्यक्त केली होती. मात्र, राजकीय हस्तक्षेप आणि इच्छाशक्तीच्या अभावामुळे प्रशासकीय यंत्रणा हतबल झाल्याचे चित्र दिसत आहे. परिणामी अवैध धंदे उघडपणे सुरूच असल्याची नागरिकांमध्ये नाराजी आहे.
दरम्यान, केज आणि युसुफवडगाव पोलिस ठाण्यांच्या हद्दीत मागील तीन दिवसांपासून पोलिसांनी घेतलेल्या धाडीमुळे नागरिकांमध्ये समाधानाची भावना निर्माण झाली आहे. अवैध धंदे चालविणाऱ्यांविरुद्ध संघटित गुन्हेगारी कायद्यांतर्गत गुन्हे दाखल करण्याची मागणीही जोर धरू लागली आहे. मात्र या मागणीवर खरोखर कठोर पावले उचलली जातील का, याबाबत जनतेत चर्चा सुरू आहे. कारण अनेक अवैध धंदे चालविणारे व्यक्ती सत्ताधारी किंवा विविध राजकीय नेत्यांशी संपर्कात असल्याचे उघड आहे.
नुकतेच रुजू झालेले IPS अधिकारी तथा सहाय्यक पोलिस अधीक्षक व्यंकटराम यांनी हद्द ताब्यात घेताच केज तालुक्यातील अवैध धंद्यांवर कारवाईची मोहीम सुरू केली आहे. १४ नोव्हेंबर रोजी पोलिस निरीक्षक स्वप्नील उनवणे (केज) आणि सहाय्यक पोलिस निरीक्षक मच्छिंद्रनाथ शेंडगे (युसुफवडगाव) यांच्या मार्गदर्शनाखाली केज येथे पाच ठिकाणी आणि कळंबअंबा येथे धाडी टाकण्यात आल्या.
यामध्ये गंगा माऊली साखर कारखाना परिसर, तांबवा, येवता, बीएसएनएल टॉवरच्या मागील शाळेजवळ, नांदूरघाट, कळंबअंबा येथून रोख 75,000, 5 दुचाकी, 1 मोबाईल फोन आणि जुगार साहित्य असा एकूण 2 लाख 80 हजार किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
या कारवाईत लक्ष्मण घुले, बळीराम चाटे, समीर शेख, अशोक काटकर, रघुनाथ चिंचकर, बाबू गोरखे, मसु काळे, बाळासाहेब गायकवाड, ढाकणे, धस, गायकवाड, शेख, अजय आलाट, गणेश, दयानंद हिरवे यांच्यावर महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
केज तालुक्यातील गावोगावी आणि गल्लीबोळात मटका आणि जुगारासारखे धंदे बेकायदेशीरपणे सुरू आहेत. जुगारावर कारवाई झाली तरी आरोपींना लवकर जामीन मिळतो, त्यामुळे ते पुन्हा त्याच धंद्यात सक्रिय होतात. यामुळे या मटका-जुगार चालविणाऱ्यांवर वाळू माफियांप्रमाणेच MCOCA किंवा संघटित गुन्हेगारी कायदा लागू करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.
अवैध धंदे चालविणाऱ्यांचे सत्ताधाऱ्यांशी असलेले संबंध आणि वरपर्यंत पोहोचलेले हात पाहता, पोलिसांना कारवाई करताना मर्यादा भासतात, अशी चर्चा जनतेत रंगू लागली आहे.