

How much is Beed's water in the 168 TMC of water for Marathwada?
बीड, पुढारी वृत्तसेवा : मराठवाड्यातील पाणी प्रश्न सोडविण्यासाठी कोकणातील १६८ टीएमसी पाणी मराठवाड्यात आणण्यासाठी सरकारचे प्रयत्न सुरू आहेत. या योजनेला नाव मराठवाड्यातील असले तरी सध्या बहुतांश प्रकल्प नाशिक भागातील होत आहेत. १६८ टीएमसी पाण्याचे नियोजन करणे सुरु आहे, या पाण्यातून बीड जिल्ह्यातील शेतीला किती पाणी मिळणार, असा रोकडा सवाल श्रृंगऋषीगड येथे आयोजित संवाद बैठकीत उपस्थित शेतकर्यांनी लोकप्रतिनिधींना केला.
या बैठकीस बप्पासाहेब तळेकर, राजसाहेब पवळ, भाऊसाहेब जरांगे पाटिल, शिवप्रसाद खेडकर, रामराव खेडकर, सुरेश महाराज कोळेकर, घुराजी बाबा कोळेकर, तुकाराम तळतकर, परमेश्वर वाघमोडे, गावडे मामा, गणेश कोळेकर, महादेव कारांडे, सुधीर माने भारत सोळुंके, गोपाल आहेर, भाऊसाहेब महानोर, सरपंच नंदकुमार शिंदे, दीपक जाधव आदींसह शेतकरी उपस्थित होते.
सिंदफणा पट्ट्यासह बीड जिल्ह्यातील बहुतांश शेतीला जायकवाडी धरण अथवा पाटाचे पाणी मिळत नाही. त्यातच बीड जिल्ह्यात दर तीन चार वर्षाने दुष्काळ पडतो. त्यामुळे फळबाग, ऊस, भाजीपाला उत्पादकसह इतर शेतकऱ्यांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागते. या शेतकऱ्यांना जायकवाडी धरणाचे पाणी मिळावे यासाठी तीनशेपेक्षा अधिक गावांनी एकत्र येत लोकलढा आंदोलन सुरू केले आहे. या आंदोलनाची महत्वाची वार्षिक बैठक शिरूर तालुक्यातील श्रृंगऋषीगड येथे आयोजित केली होती.
या बैठकीत लोकलढा आंदोलनाच्या कामांचा आढावा घेण्यात आला. यावेळी जलतज्ज्ञ व अनुभवी शेतकरी यांनी मार्गदर्शन केले. मराठवाड्यातील शेतीला पाणी मिळावे व या भागातील दुष्काळ दूर व्हावा यासाठी सरकार पश्चिमी वाहिनी नद्यांचे कोकणात जाणारे यातील १६८ टीएमसी पाणी मराठवाड्यात आणण्यासाठी विविध योजना राबवित आहे.
ही योजना मराठवाड्यातील दुष्काळ दूर करण्यासाठी असली तरी सध्या या योजनेतून नाशिक व इतर भागातच कामे सुरू आहेत, सरकारला जर बीड जिल्ह्यातील दुष्काळ दूर करायचा असेल तर बीड जिल्ह्यातील शेतीला नेमके किती पाणी मिळणार आहे हा आकडा सरकार व बीड जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींनी सांगावा असा प्रश्न या बैठकीत शेतकऱ्यांनी उपस्थित केला.
जायकवाडी धरणाचे पाणी नांदेड पर्यंत गेले, मात्र हे पाणी बीड जिल्ह्यातील ऐंशी टक्के शेतीला मिळत नाही, माजलगाव धरण व गेवराई तालुक्यातून जाणार्या कालव्याचे पाणीही सरकारने कमी केले, आता १६८ टीएमसी पाण्यापासूनही बीड जिल्हा वंचित राहिल्यास बीड जिल्ह्यातील शेतकर्यांच्या नशिबी ऊसतोड, तरुणांचे स्थलांतर व आत्महत्या कायम राहत्याल. त्यामुळे १६८ टीएमसी पाण्यात बीड जिल्ह्यातील शेतीला किती पाणी मिळणार, सर्व बीड जिल्हा पाण्याखाली येईल का, यासाठी सरकार व लोकप्रतिनिधी यांनी काय केले, याची माहिती जिल्ह्यातील सर्व लोकप्रतिनिधींनी शेतकर्यांना द्यावी, अशी मागणीही यावेळी शेतकर्यांनी केली. या बैठकीस शेतकऱ्यांची मोठ्या संख्येने उपस्थित होती