

Even as the month of August draws to a close, Beed has not received satisfactory rainfall
बीड, पुढारी वृत्तसेवाः ऑगस्ट महिना संपत आला तरी समाधानकारक पाऊस झालेला नाही. अधुनमधून आलेल्या पावसाच्या सरींवर पिकांनी तग धरली होती, परंतु आता पंधरा दिवसांपासून अधिकचा खंड झाल्याने पिकांनी माना टाकल्या आहेत. तर दुसरीकडे १६४ लघु व मध्यम सिंचन प्रकल्पापैकी २८ प्रकल्प कोरडेठाक आहेत तर ७१ प्रकल्प जोत्याखाली आहेत. या परिस्थितीमुळे शेतकरी, सर्वसान्यांचे डोळे आकाशाकडे लागले आहेत. तर आष्टीसाठी कुकडीचे पाणी अधिक वेगाने सोडण्याची मागणी माजी आमदार बाळासाहेब यांनी प्रशासनाकडे केली आहे, या प्रश्नावर आंदोलनाचा इशारा देखील त्यांनी दिलाय-
टाकरवन खरीप हंगामातील सुरवातीच्या टप्प्यात जोरदार ते मध्यम स्वरूपाची हजेरी लावणाऱ्या पावसाने गेल्या तीन ते चार आठवड्यांपासून दडी मारल्यामुळे शेती संकटात सापडली आहे. कडक ऊन आणि पाण्याचा तीव्र तुटवडा यामुळे कापूस आणि सोयाबीनची पिके शेतातच करपू लागली आहेत.
जुलै च्या शेवटच्या आठवड्यात झालेल्या समाधानकारक पावसामुळे शेतकऱ्यांनी मोठ्या आशेने पेरण्या पूर्ण केल्या होत्या. मात्र, पिके वाढीच्या आणि फुलोऱ्याच्या महत्त्वाच्या टप्प्यात असतानाच पावसाने दगा दिला. विहिरी आणि कूपनलिकांची पाणीपातळी खालावल्याने पिकांना संरक्षित पाणी देणेही अशक्य झाले आहे. कडक उन्हामुळे सोयाबीनची पाने पिवळी पडून कोमेजली आहेत, तर कापसाची पातगळ होऊन झाडे वाळू लागली आहेत. दुबार पेरणीचे संकट आणि बँकांचे कर्ज डोक्यावर असताना हातातोंडाशी आलेला घास हिरावला जात असल्याने बळीराजा हवालदिल झाला आहे. कृषी विभागाने तातडीने पिकांचे पंचनामे करून बाधित शेतकऱ्यांना आर्थिक मदत जाहीर करावी आणि दुष्काळसदृश परिस्थितीची दखल घ्यावी, अशी तीव्र मागणी शेतकरी संघटनांकडून केली जात आहे.
तालुक्यातील ममदापूर, पाटोदा, देवळा यासह आपेगाव व आंजनपूर परिसरात यंदा पावसाने ओढ दिल्याने ऊस पिकाची वाढ पूर्णपणे खुंटली आहे. रोहिणी आणि मृग नक्षत्रात समाधानकारक पाऊस न पडल्याने तसेच ऐन वाढीच्या काळात पावसाने प्रदीर्घ खंड दिल्याने उसाच्या कांड्या आखूड राहिल्या आहेत. यामुळे तालुक्यातील ऊस उत्पादक शेतकरी मोठ्या चिंतेत सापडले आहेत.
तालुक्यातील ममदापूर, पाटोदा, देवळा, आपेगाव, अंजनपुर यासह इतर परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात ऊस लागवड होते, यामुळे हा परिसर "ग्रीन बेल्ट" म्हणून ओळखला जातो. यावर्षी या परिसरातील शेतकऱ्यांनी खते, औषधे आणि मशागतीवर हजारो रुपयांचा खर्च करून उसाची लागवड केली होती. जुलै व ऑगस्ट या पिकाच्या वाढीसाठी अत्यंत महत्त्वाच्या महिन्यांत पावसाने जोरदार हजेरी लावणे अपेक्षित होते; मात्र पावसाने दीर्घ विश्रांती घेतल्याने उसाची अपेक्षित उंची व जाडी वाढलेली नाही. सध्या ऊस केवळ कमरेइतका किंवा छातीइतकाच वाढला असून, पानाच्या वाढीवरही विपरीत परिणाम झाला आहे.
परिसरात पुरेसा पाऊस न झाल्याने स्थानिक ओढे, नाले कोरडे पडले आहेत. भूजल पातळी खालावल्याने कूपनलिका व विहिरींचे पाणी आटले आहे. त्यातच ग्रामीण भागात वीजपुरवठ्याचा लपंडाव सुरू असल्याने उपलब्ध पाणीही पिकाला देता येत नाही. अनेक ठिकाणी पाण्याचे दुर्भिक्ष आणि कडक उन्हामुळे उसाची पाने पिवळी पडून फड सुकण्याच्या मार्गावर आहेत.
यावर्षी पावसाने मोठ्या प्रमाणात ओढ दिल्याने अनेक पिकांचे नुकसान होत आहे ऊस पिकाला भरपूर पाणी आवश्यक आहे परंतु पाऊस नसल्यामुळे उस चिपाडासारखा दिसत आहेत असे देवळा येथील शेतकर रविंद्र देवारवाडे यांनी सांगितले.
उत्पादनात ५० ते ६० टक्के घट
उसाची वाढ खुंटल्यामुळे प्रति एकर सरासरी उत्पादनात ५० ते ६० टक्क्यांहून अधिक घट होण्याची भीती शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे. उसाच्या वजनात मोठी घट होणार असल्याने आगामी गळीत हंगामात उत्पादन खर्चही निघणे कठीण होणार आहे. बँकांचे पीककर्ज, रासायनिक खतांचा खर्च आणि मजुरी कशी भागवायची, असा बिकट प्रश्न शेतकऱ्यांसमोर निर्माण झाला आहे.