

पाटोदा ः तालुक्यातील चिखली ते शृंगेरीदेवी दरम्यान कोट्यवधी रुपयांचा रस्ता मंजूर झालेला असून आता या रस्त्याचे काम निकृष्ट व मनमानी पद्धतीने सुरू असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. रस्त्याची रुंदी अनेक ठिकाणी कमी ठेवलेली आहे. तसेच आवश्यक त्या ठिकाणी पूल उभारण्यात आलेले नाहीत. रस्त्याच्या कामाचा दर्जाही सुमार असल्याने या सर्व प्रकाराची चौकशी करावी अन्यथा उपोषण करण्याचा इशारा चिखली ग्रामस्थांनी दिला आहे. याबाबतचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांसह कार्यकारी अभियंता यांना देण्यात आले आहे.
गेल्या अनेक वर्षांपासूनच्या मागणीनंतर पाटोदा तालुक्यातील चिखली ते शृंगेरीदेवी (ग्रामीण मार्ग 105) रस्ता मंजूर झाला होता. या रस्त्याच्या कामाला प्रारंभ झाला परंतु कंत्राटदार मनमानी पद्धतीने काम करत आहे. त्याकडे अधिकाऱ्यांचेही सोयीस्कर दुर्लक्ष असल्याने ग्रामस्थांमधून संताप व्यक्त केला जात आहे. रस्ता रुंदीकरण 33 फुटांचे आहे परंतु सिमेंट रस्ता केवळ 9 फुटांचा केला आहे. त्याच्या दोन्ही बाजूला मोठमोठे खड्डे करून त्यातीलच माती रस्त्याला भराव टाकण्यासाठी वापरली आहे.
रस्त्याच्या बाजूचे पंखे अद्याप भरलेले नाहीत, त्यामुळे अपघाताच्या घटनादेखील होत आहे. सिमेंट रस्ता असल्याने त्याला योग्य प्रमाणात पाणी देणे आवश्यक होते, परंतु पाणी देताना हात आखडता घेतल्याने आतापासूनच खडी आणि सिमेंट उखडू लागले आहे. या सर्व प्रकाराची चौकशी करावी, अशी मागणी आता चिखली ग्रामस्थांनी केली आहे.
याबाबतचे निवेदन जिल्हाधिकारी व महाराष्ट्र ग्रामीण रस्ते विकास संस्थेच्या कार्यकारी अभियंता यांना देण्यात आले आहे. चौकशी करून दर्जेदार काम न झाल्यास उपोषण करण्याचा इशारा या निवेदनातून देण्यात आला आहे. यावर रोहिदास येवले, सारिका येवले, यश येवले, श्रेया येवले, बापु शिंदे, निवृत्ती येवले, गहिनीनाथ येवले, वैजीनाथ लाड, गहिनीनाथ सुरवसे, आजिनाथ शिंदे, शहादेव लाड, सागर शिंदे, अशोक राऊत, भाऊसाहेब सुरवसे, आजिनाथ सुरवसे आदींच्या सह्या आहेत.
ग्रामस्थांनी नोंदवलेले आक्षेप
साहेबराव सुरवसे व दादा लाड यांच्या शेताजवळ तसेच नवनाथ लाड यांच्या घराजवळ, चिखली गावालगत पश्चिमेकडून तलावाच्या व नदीच्या प्रवाह वाहतो या सर्व ठिकाणी पूल करण्यात आला नाही, रस्त्यावर प्रत्येकी दोनशे फुटांवर पाईपलाईन टाकण्यासाठी किंवा पाणी काढण्यासाठी सिमेंट पाईप टाकले गेले नाही, रस्त्याच्या कामादरम्यान पाणी दिले गेले नसल्याने रस्त्याला आताच भेगा पडल्या, सिमेंट रस्ता, पंखा, नाली हे काम 22 फुटांमध्ये होणार असताना 33 फूट रुंदीचे खोदकाम कशासाठी करण्यात आले? यासह इतर आक्षेप ग्रामस्थांनी नोंदवले असून या सर्व प्रकाराची चौकशी न केल्यास 13 एप्रिलपासून उपोषण करण्याचा इशारा देण्यात आला आहे.