

Beed News: Revenue employees go on strike against the dictatorial behavior of the Tehsildar
कडा, पुढारी वृत्तसेवा: आष्टी तहसिलदार वैशाली पाटील यांच्या कथित हुकूमशाही, दडपशाही व अपमानास्पद वर्तणुकीविरोधात आष्टी तालुक्यातील सर्व ग्राम महसूल अधिकारी व मंडळ अधिकाऱ्यांनी सामूहिक रजेवर जाण्याचा निर्णय घेतला आहे.
तहसिलदारांची बदली होईपर्यंत कोणतेही कामकाज न करण्याचा इशारा कर्मचाऱ्यांनी दिल्याने तालुक्यातील महसूल प्रशासन ठप्प होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या संदर्भात उपविभागीय अधिकारी यांना दि. २० जानेवारी २०२६ रोजी सादर करण्यात आलेल्या निवेदनात कर्मचाऱ्यांनी गंभीर आरोप केले आहेत. निवेदनानुसार, तहसिलदार पाटील या वारंवार अपमानास्पद व अर्वाच्य भाषेचा वापर करून मानसिक छळ करीत असून कार्यालयात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
दि. १९ जा-नेवारी रोजी तहसील कार्यालयात झालेल्या बैठकीदरम्यान ग्राम महसूल अधिकारी प्रवीण शिंदे यांनी बाहेरील गुंड प्रवृत्तीच्या दोन व्यक्तींना बैठकीत आणून गोंधळ घातल्याचा आरोप करण्यात आला आहे. बैठकीदरम्यान अर्वाच्य भाषेत शिवीगाळ, दमदाटी व मारहाणीच्या धमक्या देण्यात आल्या. हा प्रकार तहसिलदार व नायब तहसिलदार यांच्या समोर घडूनही संबंधित व्यक्तींच्या विरोधात कोणतीही कारवाई न करता उलट कर्मचाऱ्यांनाच धमकावण्यात आल्याचा आरोप निवेदनात नमूद आहे. माझी कुठेही तक्रार करा, कलेक्टरकडे जा किंवा मंत्र्याकडे जा. माझं कोणी काही करू शकत नाही, असे वादग्रस्त वक्तव्य करत कर्मचाऱ्यांचा अपमान करण्यात आल्याचेही निवेदनात म्हटले आहे.
तसेच नोकरी सोडून द्या, तुम्ही नोकरीस लायक नाही, जनावरांसारखे आहात, अशा शब्दांत वारंवार मानसिक छळ केला जात असल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. आठवड्यातून किमान पाच दिवस बैठका घेतल्या जात असल्याने प्रत्यक्ष जन-तेची कामे खोळंबत असून काही मोजक्या 'मर्जीतील' अधिकाऱ्यांना वगळता इतर सर्व कर्मचाऱ्यांना लक्ष्य केले जात असल्याचा आरोप करण्यात आला आहे.
ग्राम महसूल अधिकारी व मंडळ अधिकाऱ्यांना शिपाई दर्जाहूनही खालची वागणूक दिली जात असल्याचे निवेदनात स्पष्ट करण्यात आले आहे. दि. १६ जानेवारी रोजी तालुका कार्यकारिणी निवडीदरम्यान झालेल्या चर्चेनंतर तहसिलदार अधिक आक्रमक झाल्या असून सूडभावनेतून त्रास वाढवला जात असल्याचा आरोप आहे. दि. १७ जा-नेवारी रोजी झालेल्या बैठकीत महिला कर्मचारी उपस्थित असताना अर्वाच्य भाषेचा वापर केल्याने कर्मचाऱ्यांमध्ये तीव्र संतापाची लाट उसळली आहे.
तहसीलदारांची बदली होईपर्यंत व संबंधित अधिकाऱ्यावर योग्य प्रशासकीय कारवाई होईपर्यंत सामूहिक रजा आंदोलन मागे घेतले जाणार नाही, असा इशारा देण्यात आला आहे. या आंदोलनात आष्टी तालुक्यातील एकूण ३७ ग्राम महसूल अधिकारी व मंडळाधिकारी सहभागी झाले असून निवेदनावर तालुका अध्यक्ष अशोक सुरवसे यांच्यासह सर्व अधिकाऱ्यांच्या सह्या आहेत.