

Theft at a mobile shop; mobile phones worth lakhs stolen
गेवराई, पुढारी वृत्तसेवा: गेवराई शहरातील माया मोबाईल शॉपमध्ये अज्ञात चोरट्यांनी मोठी चोरी केल्याची घटना उघडकीस आली असून, या चोरीत नामांकित कंपन्यांचे महागडे मोबाईल फोन लंपास करण्यात आले आहेत. चोरीचा मुद्देमाल लाख रुपयांपेक्षा अधिक असल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविण्यात येत आहे.
ही घटना सोमवार, दि. १९ जानेवारी २०२६ रोजी रात्री सुमारे ११ वाजण्याच्या सुमारास घडली. मंगळवारी सकाळी दुकान उघडल्यानंतर मालक विनोद दुरांडे यांच्या निदर्शनास चोरी आल्याने त्यांनी तात्काळ पोलिसांना माहिती दिली. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला असून सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे तपास सुरू असल्याचे सांगण्यात आले आहे.
दरम्यान, अलीकडच्या काळात शहर व तालुक्यात चोरीच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली असून, पोलीस प्रशासनाचा वचक राहिला नसल्याची चर्चा व्यापारी व नागरिकांमध्ये सुरू आहे. दर-वेळी मनुष्यबळ कमी आहे हेच कारण दिले जाते; मात्र आता हे कारण नागरिकांच्या दृष्टीने बोथट ठरत असल्याची प्रतिक्रिया व्यक्त होत आहे. व्यापाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले असून, रात्रीची गस्त वाढवावी, चोरीसारख्या घटनांवर तातडीने कारवाई व्हावी, अशी मागणी होत आहे.
"कायदा व सुव्यवस्था राखणे हे पोलिसांचे प्राथमिक कर्तव्य आहे. जर त्यासाठी वेळ मिळत नसेल, तर शहरातील वाढत्या गुन्हेगारीला जबाबदार कोण?" असा सवाल नागरिक उपस्थित करत आहेत. या प्रकरणाचा पुढील तपास सुरू असून, आर- ोपी लवकरच जेरबंद होतील, असा दावा पोलिसांकडून करण्यात येत आहे. मात्र केवळ दावे नव्हे, तर ठोस कारवाई दिसावी, अशी अपेक्षा व्यापारी व नागरिक व्यक्त करत आहेत.