

माजलगाव : खरीप हंगामातील पिकांची अचूक नोंद शासनाच्या अभिलेखात होण्यासाठी माजलगाव तालुक्यात ई-पीक पाहणीच्या कामाला वेग आला आहे. तालुक्यातील विविध गावांमध्ये शेतशिवारात प्रत्यक्ष जाऊन पिकांची पाहणी व नोंद करण्याची प्रक्रिया सुरू असून महसूल विभागाकडून शेतकऱ्यांच्या शेतातील पिकांची माहिती संकलित केली जात आहे.
ई-पीक पाहणीमध्ये शेतामध्ये प्रत्यक्ष कोणते पीक घेतले आहे, त्याचे क्षेत्रफळ तसेच पिकाची स्थिती यासह आवश्यक माहितीची नोंद केली जाते. यामुळे महसूल विभागाच्या नोंदीमध्ये शेतकऱ्यांच्या प्रत्यक्ष पीक परिस्थितीची माहिती उपलब्ध होण्यास मदत होते. पारंपरिक पद्धतीऐवजी डिजिटल पद्धतीने ही माहिती संकलित केली जात असल्याने भविष्यातील शासकीय योजनांसाठीही त्याचा उपयोग होणार आहे.
पीक विमा, नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या नुकसानीची भरपाई, पीक कर्ज तसेच विविध शासकीय योजनांचा लाभ घेताना पीक नोंदीला महत्त्व असते. त्यामुळे शेतकऱ्यांनी आपल्या शेतात प्रत्यक्ष घेतलेल्या पिकांची योग्य व अचूक नोंद होणे आवश्यक आहे. चुकीची किंवा अपूर्ण पीक नोंद झाल्यास भविष्यात अडचणी निर्माण होऊ शकतात.
माजलगाव तालुक्यात यंदा खरीप हंगामात मोठ्या प्रमाणावर सोयाबीन, कापूस, तूर, मूग, उडीद यांसह विविध पिकांची लागवड करण्यात आली आहे. पावसाच्या अनिश्चिततेमुळे काही भागात पिकांच्या स्थितीतही बदल होत असल्याने प्रत्यक्ष शेतशिवारातील पाहणीला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.
दरम्यान, ज्या शेतकऱ्यांच्या शेतातील पीक पाहणी अद्याप झालेली नाही, त्यांनी संबंधित नियुक्त कर्मचाऱ्यांशी संपर्क साधून आपल्या पिकाची अचूक नोंद करून घ्यावी, असे आवाहन महसूल विभागा कडून करण्यात येत आहे. शेतकऱ्यांनी पीक पाहणीच्या वेळी आपल्या शेतातील प्रत्यक्ष पीक व क्षेत्राची योग्य माहिती उपलब्ध करून देणे गरजेचे आहे.
पीक पाहणीची अचूक नोंद ही केवळ महसूल अभिलेखापुरती मर्यादित नसून शेतकऱ्यांना भविष्यात मिळणाऱ्या विविध शासकीय योजनांच्या लाभासाठी महत्त्वाचा आधार ठरणार आहे. त्यामुळे तालुक्यातील प्रत्येक शेतकऱ्याने पीक पाहणीची प्रक्रिया गांभीर्याने पूर्ण करून घ्यावी, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.