

Union Home Minister Dakshata Padak
राजू म्हस्के
कडा : देशाच्या अंतर्गत सुरक्षेला आव्हान देणाऱ्या दहशतवादी कारवायांचा बीमोड करण्यात आणि अत्यंत संवेदनशील गुन्ह्यांच्या तपासात मोलाची भूमिका बजावल्याबद्दल बीड जिल्ह्याचे सुपुत्र आणि मुंबईचे पोलीस उपायुक्त बजरंग आनंदराव बनसोडे यांना मानाचे 'केंद्रीय गृहमंत्री दक्षता पदक' प्रदान करण्यात आले. दिल्ली येथे आयोजित 'आतंकवाद विरोधी संमेलनात' देशाचे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, नित्यानंद राय गृह राज्यमंत्री, बंङी संजय कुमार गृह राज्यमंत्री, देशाचे गृह सचिव गोविंद मोहन, एनआयएचे महासंचालक सदानंद दाते व वरिष्ठ स्तरावरील अधिकारी यांच्या उपस्थितीत हा सन्मान सोहळा दिमाखात पार पडला.
राष्ट्रीय तपास यंत्रणा (NIA) ही देशातील सर्वोच्च तपास संस्था आहे, आंतरिक सुरक्षा, दहशतवाद व देशविघातक कारवाया आणि अंमली पदार्थांच्या तस्करींसारख्या गुन्ह्यांचा तपास करते. बजरंग बनसोडे यांनी मे 2022 ते ऑगस्ट 2025 पर्यंत 'एनआयए' मध्ये अपर पोलीस अधीक्षक म्हणून प्रतिनियुक्तीवर काम केले. या काळात त्यांनी देशाच्या सुरक्षेसाठी अनेक 'स्पेशल ऑपरेशन्स' यशस्वी केली. तसेच उत्कृष्ट तपास केले, त्यांच्या याच निष्ठेची आणि शौर्याची दखल घेत केंद्र सरकारने त्यांना या पदकाने सन्मानित केले आहे.
ऊसतोड कामगाराचा जिल्हा म्हणून ओळख असलेला बीड अन त्यात कायमस्वरूपी दुष्काळग्रस्त अशी ओळख निर्माण झालेल्या आष्टी तालुक्यातील शेतकरी कुटुंबातील श्री.बजरंग बनसोडे यांचा प्राथमिक शिक्षक ते पोलीस उपायुक्त प्रवास हा अत्यंत खडतर पण तितकाच जिद्दीचा व प्रेरणादायक आहे.बीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्यातील रुई नालकोल सारख्या छोट्या गावात, एका गरीब शेतकरी कुटुंबात त्यांचा जन्म झाला. प्रतिकूल परिस्थितीमुळे त्यांना शिक्षणासाठी मोठा संघर्ष करावा लागला.११ व १२वीच्या शिक्षणासाठी ऊन- पावसाची तमा न बाळगता ते रोज २० किलोमीटर सायकल चालवून महाविद्यालयात जात असत. पुढील शिक्षणासाठी पैसा उभा राहावा म्हणून त्यांनी पनवेल येथील एका रसवंतीवर अवघ्या ५०० रुपये महिना पगारावर काम केले आणि आज ते मुंबईत पोलीस उपायुक्त पदावर कार्यरत आहेत.
सुरुवातीला त्यांनी धाराशिव आणि बीडमध्ये प्राथमिक शिक्षक म्हणून काम केले.मात्र, प्रशासकीय सेवेची जिद्द त्यांना स्वस्थ बसू देईना.स्पर्धा परीक्षेतून त्यांची दोनदा फौजदार, एकदा मुख्याधिकारी आणि शेवटी पोलीस उपअधीक्षक पदी निवड झाली.
बजरंग बनसोडे यांनी आपल्या कारकिर्दीत मिरज,अहिल्यानगर, उपविभागीय अधिकारी,महाराष्ट्र पोलीस प्रबोधिनी नाशिक, सहायक पोलीस आयुक्त, ट्रॉम्बे, पोलीस अधीक्षक (स्पेशल ऑपरेशन्स), महाराष्ट्र राज्य, मुंबई आणि बुलढाणा येथे अपर पोलीस अधीक्षक म्हणून उल्लेखनीय सेवा बजावली आहे. सध्या ते पोलीस उपायुक्त म्हणून बृहन्मुंबई येथे कार्यरत आहेत.
एका सामान्य पार्श्वभूमीतून आलेल्या युवकाने आपल्या कर्तृत्वाने देशाच्या गृहमंत्रालयाकडून'आंतरिक सुरक्षेसाठीचे 'केंद्रीय गृहमंत्री दक्षता पदक'मिळवणे ही बाब केवळ कुटुंबासाठीच नव्हे,तर गाव रुई नालकोल, संपूर्ण बीड जिल्हा आणि महाराष्ट्र पोलीस दलासाठी अभिमानास्पद ठरली आहे. शिस्त, कष्ट आणि राष्ट्रनिष्ठा असेल तर कोणतीही परिस्थिती यशाच्या आड येत नाही, असा संदेशच त्यांनी आपल्या कार्यातून दिला आहे. या यशाबद्दल त्यांचे सर्व स्तरांतून अभिनंदन होत असून भविष्यातही त्यांच्या हातून अशीच देशसेवा घडावी, अशा शुभेच्छा दिल्या जात आहेत.