

बीड ः भारतीय संविधानाचे शिल्पकार, बोधिसत्व, प्रज्ञासूर्य, महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्मदिन जगातील अनेक देशांत उत्साहात साजरा केला जातो. त्यानिमित्त मंगळवारी (दि.14) बीड शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसरात अभिवादनासाठी पांढरे शुभ्र वस्त्र परिधान करून भीम अनुयायांचा जनसागर उसळला होता.
यावेळी भिक्खू धम्मशील थेरो यांनी उपस्थित भीम अनुयायांना त्रिशरण आणि पंचशील ग्रहण करून दिले. बौद्ध धम्माच्या या मूलभूत तत्त्वांचा स्वीकार करुन उपस्थित भिम सागराने महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या चरणी पुष्पफुले वाहिली. जयंतीनिमित्त काढण्यात आलेली समता ज्योत रॅली राज्यात आदर्श ठरली.
बीड शहरातील डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळा परिसरात आयोजित अभिवादन कार्यक्रमास जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन, पोलिस अधीक्षक नवनीत काँवत, अतिरिक्त पोलिस अधीक्षक सचिन पांडकर, मुख्य कार्यकारी अधिकारी जितीन रहेमान, एसडीएम कविता जाधव, तहसीलदार चंद्रकांत शेळके, नायब तहसीलदार सुहास हजारे यांनी धम्म ध्वजाचे ध्वजारोहण करून त्यांना वंदन करत अभिवादन केले. दरम्यान समता सैनिक दलाचे अमरसिंह ढाका आणि त्यांच्या टीमने डॉ.बाबासाहेब आंबेडकरांना मानवंदना दिली.
यावेळी नगराध्यक्ष प्रेमलता पारवे, आ. संदीप क्षीरसागर, संदीप उपरे, प्रा.प्रदीप रोडे, युवा रिपाइं प्रदेशाध्यक्ष पप्पू कागदे, अजय सवाई, राजू जोगदंड, सुभाष राऊत, अशोक लोढा, नितीन धांडे, चंद्रकांत नवले, अशोक वाघमारे, पत्रकार सुनील डोंगरे, महालिंग निकाळजे, गौतम खेमाडे, अनिल डोळस, अरुणाताई आठवले, गौतम चोपडे, ॲड.मनोज वाघमारे, सुमेध जोगदंड, प्रणित सरवदे, ॲड. नितीन वाघमारे, ॲड.राजेश शिंदे, ॲड.तेजस वडमारे, विजयकुमार समुद्रे, संतोष गायकवाड, केशव आठवले, दयानंद सरपते, राहुल कांबळे, उध्दव बनसोडे, प्रा. प्रदिप गाडे, प्रा.डॉ.प्रेमचंद सिरसट,प्रा. राम गायकवाड, प्रा. अशोक गायकवाड, प्रा. पांडुरंग सुतार, प्रा. पंडीत मुने, किरण निसर्गंध, महादेव इनकर, शरद मगर, सुरेश साबळे, अशोक ठोकळ, कल्याण भंडारे, तानाजी शिनगारे, संजय जाधव, स्वप्निल चोपडे, दिपांकर रोडे, विशाल गायकवाड, यांच्यासह प्रशांत वासनिक, यांच्यासह भीमसागर लोटला होता. दरम्यान जिल्हाभर डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यात आले.
समता ज्योत : विचारांची तेजस्वी परंपरा
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या पूर्वसंध्येला दरवर्षी काढली जाणारी समता ज्योत ही केवळ एक परंपरा नसून, समतेच्या विचारांचा जागर करणारी प्रेरणादायी चळवळ ठरत आहे. छत्रपती शिवाजी महाराज पुतळा ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा असा हा प्रवास म्हणजे इतिहास आणि परिवर्तन यांची सांगड घालणारा प्रतीकात्मक संदेश आहे. युवा रिपाइं प्रदेशाध्यक्ष पप्पू कागदे, पोलिस अधीक्षक नवनीत काँवत आदी मान्यवरांच्या हस्ते ज्योतीचे प्रज्वलन होत असल्याने या उपक्रमाला अधिक सामाजिक अधिष्ठान लाभते. समता, बंधुता आणि न्यायाचा प्रकाश सर्वत्र पसरवणारी ही समता ज्योत बीडच्या सामाजिक जागृतीचे जिवंत प्रतीक ठरत आहे.
असा रंगला जयभीम महोत्सव
डॉ. बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक जयंती उत्सव समितीच्या वतीने स्वबळावर आयोजित करण्यात आलेला जयभीम महोत्सव उत्साहात पार पडला. 5 ते 14 एप्रिल या कालावधीत विविध सामाजिक आणि शैक्षणिक उपक्रम राबवून महोत्सवाला वेगळे स्वरूप देण्यात आले. व्याख्याने, रक्तदान शिबीर, अठरा तास अभ्यास उपक्रम, भीमगीत गायन, नृत्य स्पर्धा तसेच समताज्योत, महाराष्ट्राचे प्रसिद्ध गायक अनिरुद्ध वनकर यांची भव्य संगीत रजनी अशा उपक्रमांमुळे महोत्सव केवळ उत्सव न राहता खऱ्या अर्थाने विचारांचा जागर ठरला.