

लातूर : भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार विश्ववंद्य महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती शहर व जिल्ह्यात मंगळवारी (दि.14) अतिशय उत्साहात साजरी करण्यात आली. जय भीमच्या निनादाने आसमंत दुमदुमला. रोषणाईच्या झगमगाटात आणि मिरवणुकांच्या उत्साहात संपूर्ण शहर निळाईत न्हाऊन निघाले. आनंदाचा हा क्षण आवडता सण म्हणूनच साजरा करण्यात आला.
सोमवारी मध्यरात्री आंबेडकर पार्कवर बाबासाहेबांच्या पुतळ्यास अभिवादन करून जयंतीस उत्सहात सुरुवात झाली. महामानवाच्या जयंतीसाठी लातूर शहर सजले होते. प्रत्येक चौका-चौकांत स्वागत कक्ष उभारण्यात आले होते. व्यासपीठाची शुभ्र पार्श्वभूमी, भगवान बुध्द अन् बाबासाहेबांच्या प्रतिमा मनाला मोठा आनंद देत होत्या. जिल्हाधिकारी डॉ. भारत बास्टेवाड, पोलिस अधीक्षक अमोल तांबे, जिल्हा परिषदेचे सीईओ राहुलकुमार मीना, मनपा आयुक्त मानसी मीना यांच्यासह अन्य अधिकारी कर्मचारी, नागरिकांनी आंबेडकर पार्कवरील बाबासाहेबांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
याशिवाय, विविध पक्ष संघटनांचे पदाधिकारी कार्यकर्ते व नागरिकांनीही बाबासाहेबांना अभिवादन करण्यसाठी मोठी गर्दी केली होती. सायंकाळी शहरातील विविध भागातून डॉ. बाबासाहेब आंबेडकर पार्ककडे शेकडो मिरवणुका मार्गस्थ झाल्या. बाबासाहेबांची महानता सांगणारे अन् त्यांच्या समर्पणाने झालेले परिवर्तन सांगणारे अनेक गीते लक्ष वेधत होती.
नृत्य करणारी तरुणाई, त्यांचा उत्साह, विद्युत रोषणाई, भगवान बुध्द अन बाबासाहेबांच्या प्रतिमा सारेच डोळ्याचे पारणे फेडणारे होते. दिवसभर अनेक समाजोपयोगी कार्यक्रम घेण्यात आले. यात व्याखाने, अन्नसेवा, पुस्तक वाटप, पुस्तक वाचन अशा उपक्रमांचा त्यात समावेश होता. बाबासाहेब आंबेडकर पार्कवर भीमरायास अभिवादन करण्यासाठी लोटलेला जनसागर बाबासाहेबांच्या अन् त्यांच्या या अतुट आंतरिक नात्याची साक्षच देत होता.