

Kej Drunk Driving Case
केज : केज शहरातील गजबजलेल्या कानडी माळी चौकात कानडी रोडवर मद्यधुंद अवस्थेत असलेल्या कारचालकाने बेदरकारपणे वाहन चालवत अपघातांची मालिका घडवली. एका मोटारसायकलीला धडक दिल्यानंतर पळून जाण्याच्या प्रयत्नात त्याने विद्यार्थ्यालाही धडक दिली. त्यानंतर रस्त्यालगत असलेल्या दुकानासमोर उभ्या दुचाकी वाहनांना धडक देत कार थेट दुकानात घुसली. या घटनेत तिघे जखमी झाले असून दोन मोटारसायकल, एक स्कूटर व विद्यार्थ्याच्या सायकलीचे नुकसान झाले आहे.
अपघातातील जखमी :
आशाबाई धोंडीबा राऊत (रा. समर्थनगर, केज)
राम लक्ष्मण धर्मा (रा. मेंढक, तेलंगणा)
धनराज बन्सी चाळक (रा. लव्हूरी, ता. केज)
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, ९ जानेवारी रोजी दुपारी सुमारे १ वाजता कानडी माळी चौकातील भगवान बाबा चबुतऱ्याजवळ स्विफ्ट डिझायर कार (क्र. एमएच-१२/एचझेड-२६६२) भरधाव वेगात येत होती. कारचालक राम लक्ष्मण धर्मा (रा. मेंढक, तेलंगणा) व त्याच्या शेजारी बसलेला धनराज बन्सी चाळक (रा. लव्हूरी, ता. केज) हे दोघेही मद्यधुंद अवस्थेत होते. कानडी माळीकडे वळत असताना कारने एका मोटारसायकलीला मागून धडक दिली. या मोटारसायकलवर मागे बसलेल्या आशाबाई धोंडीबा राऊत (रा. समर्थनगर, केज) या जखमी झाल्या.
अपघातानंतर कारचालकाने पळ काढण्याचा प्रयत्न केला. मात्र नियंत्रण सुटल्याने कारने उजव्या बाजूला असलेल्या नेहा ब्युटी शॉपी व साई मंगल सेवा केंद्र या दुकानांना धडक दिली. या धडकेत दुकानासमोर उभी असलेली स्कूटर (क्र. एमएच-४४/एडी-९४८०) व मोटारसायकल (क्र. एमएच-२५/एस-१७२३) यांचे नुकसान झाले. तसेच सायकलवरून शाळेत जाणाऱ्या विद्यार्थ्याच्या सायकलीचेही नुकसान झाले. अपघातात काही नागरिक व विद्यार्थी किरकोळ जखमी झाले.
या घटनेत आशाबाई धोंडीबा राऊत, कारचालक राम लक्ष्मण धर्मा आणि धनराज बन्सी चाळक हे तिघे जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
अपघाताची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक स्वप्नील उनवणे यांच्या आदेशानुसार सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप मांजरमे यांच्यासह दत्तात्रय बिक्कड, राजू वाघमारे, बाळासाहेब अहंकारे, शिवाजी कागदे, त्रिंबक सोपने, संतोष गित्ते, गोरख फड व तांबारे यांनी घटनास्थळी धाव घेतली. जखमींना उपजिल्हा रुग्णालयात हलवून वाहतूक सुरळीत करण्यात आली.
अरुंद रस्ता ठरतोय डोकेदुखी
कानडी रोड हा आधीच अरुंद असून दुकानदारांकडून दुकानासमोर साहित्य ठेवले जाते, तसेच दुचाकी रस्त्यावर उभ्या केल्या जात असल्याने कायम वाहतूक कोंडी होत आहे. अशा परिस्थितीत अपघातांचे प्रमाण वाढत असून याकडे प्रशासनाने तातडीने लक्ष देण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.