

आष्टी : आष्टी तालुक्यातील शेतकऱ्यांच्या पाणी प्रश्नावर आमदार सुरेश धस यांनी केलेल्या मागणीला यश मिळाले असून, सीना प्रकल्पाच्या उजव्या कालव्यातून सिंचनासाठी पाणी सोडण्यास सुरुवात करण्यात आली आहे. या निर्णयामुळे परिसरातील शेतकरी व ग्रामस्थांना मोठा दिलासा मिळाला आहे.
आ. धस यांनी कुकडी पाटबंधारे विभाग क्र. २, श्रीगोंदा येथील कार्यकारी अभियंत्यांना पत्र देत पिंपरी (घुमरी), कानडी बुद्रुक व वाकी या बंधाऱ्यांमध्ये पाणी साठवून तातडीने सिंचनासाठी पाणी सोडण्याची मागणी केली होती. प्रशासनाने याची दखल घेत त्वरित कार्यवाही केली. उजव्या कालव्यातून पाणी सोडल्याने लाभक्षेत्रातील पिकांना मोठा आधार मिळणार असून जनावरांच्या पाण्याचाही प्रश्न सुटण्यास मदत होणार आहे.
या पार्श्वभूमीवर ग्रामस्थ व शेतकऱ्यांनी आ. धस यांच्या प्रयत्नांचे कौतुक करत आभार व्यक्त केले. वेळ 'वर पाणी मिळाल्याने आमची मोठी चिंता दूर झाली, अशी भावना त्यांनी व्यक्त केली. दरम्यान, शेतकऱ्यांच्या अडचणी सोडवण्यासाठी सातत्याने पाठपुरावा करणार असल्याचे आ. सुरेश धस यांनी सांगितले असून प्रशासनानेही पाणीपुरवठा नियोजनबद्ध ठेवण्याचे आश्वासन दिले आहे.