

Arbitrary criteria in railway land acquisition in Ghatsawli; In preparation for the village movement
बीड, पुढारी वृत्तसेवा : नगर-बीड-परळी रेल्वेमार्गाचे काम अंतिम टप्प्यात असताना आता एक एक गैरप्रकार समोर येऊ लागला आहे. बीड तालुक्यातील घाटसावळी येथील भूसंपादन मावेजात मनमानीपणे निकष लावल्याचा आरोप या ठिकाणच्या ग्रामस्थांनी केला आहे. एकाच शिवारात असलेल्या एका झाडाला तब्बल चार लाख तर दुसऱ्या झाडाला अवघे चाळीस हजार याप्रमाणे मावेजा दिला गेल्याचा आरोप करण्यात येत आहे. अशाच पद्धतीने इमारत मूल्यांकनातही दुजाभाव झाल्याची तक्रार जिल्हाधिकाऱ्यांकडे करण्यात आली आहे.
बीडकरांच्या जिव्हाळ्याचा प्रश्न असलेल्या नगर-बीड-परळी रेल्वेमार्गाचे काम अंतिम टप्प्यात आहे. या मार्गासाठी झालेल्या भूसंपादनात यापूर्वीच मोठा घोटाळा समोर आला होता. गरज नसताना अतिरिक्त भूसंपादन करत अधिकाऱ्यांनी स्वतः चे उखळ पांढरे करून घेतल्याचे समोर आल्यानंतर हे भूसंपादन रद्द करण्यात आले होते.
अशाच प्रकार इतर काही ठिकाणी अधिकाऱ्यांनी 'सोयीचे' निकष लावले असल्याचे आता समोर येऊ लागले आहे. बीड तालुक्यातीलच घाटसावळी परिसरात झालेल्या भूसंपादनावरून आता आरोप होऊ लागले आहेत. या ठिकाणच्या सात शेतकऱ्यांच्या शेतात व घराच्या परिसरात असलेल्या फळझाडांना तब्बल चार लाख रुपयांप्रमाणे मावेजा देण्यात आला तर उर्वरित जवळपास तीस शेतकऱ्यांच्या झाडांना मात्र दोन हजार, आठ हजार, जास्तीत जास्त चाळीस हजारांप्रमाणे मावेजा देण्यात आला आहे.
हा दुजाभाव लक्षात आल्यानंतर या भागातील शेतकऱ्यांनी कृषी विभाग, भूसंपादन विभागापासून ते थेट जिल्हाधिकारी व खासदारांपर्यंत तक्रारी केल्या आहेत. परंतु तक्रारी विचारात न घेता मावेजा अदा करण्यात आल्याचेही ग्रामस्थांनी सांगितले. आता या सर्व प्रकरणात चौकशी करावी व उर्वरित शेतकऱ्यांनाही निकषाप्रमाणेच मावेजा देण्यात यावा अशी मागणी या ठिकाणच्या तीस शेतकऱ्यांनी केली असून यावर भूसंपादन विभागाचे उपजिल्हाधिकारी काय कारवाई करतात, याकडे ग्रामस्थांचे लक्ष लागले आहे.
शेतकऱ्यांनी दिला आंदोलनाचा इशारा
घाटसावळी शिवारातील भूसंपादनात झालेल्या या गैरप्रकारामध्ये प्लॉट एकाचा मावेजा दुसऱ्याला, इमारत मूल्यांकनात मनमानी, ऑईल रिफायनरीची जागा वाचवण्यासाठी शेतकऱ्याच्या शेतात अधिकचे भूसंपादन, त्याचाही मावेजा न देणे असे प्रकार झालेले आहेत. आता या सर्व प्रकारांची चौकशी करून दोर्षीवर कारवाई व सर्व शेतक-यांना समान न्यायाप्रमाणे मावेजा वाटप न झाल्यास आंदोलन करण्याचा इशारा देखील या शेतकऱ्यांनी दिला आहे.
असा झाला शेतकऱ्यांवर अन्याय
घाटसावळी येथील संतोष प्रल्हाद बडे यांच्या आवळ्याच्या झाडासाठी 16 हजार, मोतीराम विठ्ठल बोरडवडकर यांच्या झाडांची नोंदच नाही, अप्पासाहेब शंकर फड यांचे दोन आंब्याची झाडे त्यांना प्रत्येकी दोन हजार रुपयांनी मावेजा, प्रभाकर विठोबा नन्नवरे यांच्या एका झाडाची नोंदच झाली नाही आणि मावेजाही मिळाला नाही, बबन अप्पाराव आगे यांच्या झाडांची नोंदच नाही, प्रत्यक्षात त्यांच्या शेतात सहा झाडे आहेत. पंडित राजाराम लांडे यांच्या चार झाडांची नोंदही घेतली नाही आणि पैसेही आले नाहीत. सुरेखा रघुनाथ फड यांच्याकडे दोन झाडे होती, त्यांची नोंदच घेतली गेली नाही. तारामती चौफुले यांच्या दोन झाडांसाठी अवघे चाळीस हजार रुपये आले, शारदाबाई भागवत फड यांची आंब्याची बाग असून या झाडांचे वय अधिक असतानाही मावेजा कमी मिळाला.