अजिंठा, पुढारी वृत्तसेवा : पिंपळदरी येथे रात्रीच्या सुमारास बिबट्याच्या हल्ल्यात नऊ शेळ्या ठार झाल्याची घटना शुक्रवारी घडली. या घटनेने पशुपालकांमध्ये दहशतीने भीतीचे वातावरण पसरले असून, बिबट्याचा बंदोबस्त करावा, अशी मागणी या परिसरातील शेतकऱ्यांनी केली आहे. पिपळदरी शेत शिवारात शुक्रवारी अर्जुन गव्हाणे यांनी नेहमीप्रमाणे सांयकाळी गोठ्यात शेळ्या बांधल्या होत्या. मध्यरात्रीच्या सुमारास बिबट्याने बांधलेल्या शेळ्यावर हल्ला चढविला.
या हल्ल्यात ९ शेळ्या जागीच ठार झाल्या. घटनेची माहिती अजिंठा वनविभागाला समजताच घटनास्थळी वन परिक्षेत्र अधिकारी निलेश सोनवणे, वनपाल सय्यद, वनरक्षक सागरे, यांनी भेट देऊन पाहणी करून पंचनामा केला. यात पशुपालकांचे जवळपास ९० हजार ते एक लाख रुपये नुकसान झाले आहे. बिबट्याच्या हल्ल्यात ठार झालेल्या शेळ्याची भरपाई मिळावी, अशी मागणी या पशुपालकांनी केली आहे. त्या सोबतच बिबट्याचा बंदोबस्त करण्यासाठी पिंजरा बसविण्यात यावा, अशी मागणी ही यावेळी करण्यात आली.