भूलथापा मारणाऱ्या सरकारला जनता त्यांची जागा दाखविणार : अंबादास दानवे

भूलथापा मारणाऱ्या सरकारला जनता त्यांची जागा दाखविणार : अंबादास दानवे

पाचोड : भूलथापा मारणाऱ्या व जनतेची फसवणूक करणाऱ्या या सरकारला आगामी काळात त्यांची जागा दाखवून द्या, अशी कडाडून टीका विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी आज शुक्रवारी ( दि. ६) आडूळ येथे केली. होऊ द्या चर्चा, करूया बोलघेवडया योजनांचा भांडाफोड या कार्यक्रमाचे आयोजन आज आडूळ येथे दुपारी करण्यात आले होते. त्यावेळी अंबादास दानवे यांनी केंद्र सरकार व राज्य सरकारवर कडाडून टीका केली.

व्यासपीठावर शिवसेना (उबाठा गटाचे ) तालुकाप्रमुख मनोज पेरे, राजेंद्र राठोड, जिल्हा महिला संघटक राखी परदेशी, उपजिल्हा प्रमुख अंकुश रंधे, बद्रीनारायण भुमरे, छत्रपती संभाजीनगर तालुका प्रमुख आनंद भालेकर, युवा सेनेचे जिल्हाप्रमुख शुभम पिवळ, सरपंच बबन भावले, उपसरपंच शेख जाहेर आदींची प्रमुख उपस्थिती होती. अंबादास दानवे पुढे म्हणाले की, जायकवाडी धरण हे पैठण तालुक्यात असून देखील या तालुक्यातील गावांना याचा फायदा होत नाही. नागरिकांना पाच रुपये हंडा दराप्रमाणे पिण्याचे पाणी विकत घ्यावे लागत आहे.

राज्यातील शिंदे सरकार व केंद्रातील भाजप सरकार शेतकऱ्यांना सध्या फक्त भुलथापा देऊन कोणत्याही योजनेचा लाभ न देता फक्त आश्वासन देत आहे. तालुक्यातील शेतकऱ्यांना अद्यापही अतिवृष्टीची नुकसान भरपाई मिळाली नाही. यात सर्व सामान्य जनतेचे महागाईने कंबरडे मोडले आहे व मेटाकुटिस आलेल्या जनतेला वेठिस धरून तालुक्यातील अनेक समस्या प्रलंबित आहे. जायकवाड़ी धरणातील पाण्याचा फायदा नांदेड, परभणी, जालना, बीड या परजिल्ह्यांना होतो परंतु तालुक्यातील जनतेला एक टक्काही याचा फायदा होत नाही. त्यामुळे परिसरातील बागायती क्षेत्र घटले असून दुष्काळजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे. नागरिकांनी सरकार मधील नेत्यांना याचा जाब विचारून आगामी काळात होणाऱ्या निवडणुकीत शिंदे व भाजप सरकारच्या नेत्यांना धडा शिकवावा, अशी कडाडून टीका दानवे यांनी केली .

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news