पाचोड ; मुक्तार शेख : नियतीचा क्रूर खेळ न्याराच असतो. जे आपलं असतं तेच नेमकं नियतीच्या हृदयात जावून बसतं. आयुष्याच्या या खेळात आजवरी नियतीचाच विजय झालेला आपण पहात आलेलो आहे. नेमकं हेच शेतकरी जाधव कुटुंबीया बाबत घडलं. वडिलांच्या अपघाती मृत्यूच्या दुःखातून सावरत नाही तोच पाठोपाठ पंधरा दिवस उलटत नाही मुलाला देखील अपघातानेच जीव गमवावा लागला. (Aurangabad Accident)
पंधरा दिवसाच्या फरकाने जाधव कुटुंबाच्या घरातील दोन कर्ती माणसं हिरावून नेल्याने सासू ढवळाबाई पाठोपाठ सून काजलवर देखील विधवा होण्याची नशिबी आल्याची प्रसंग मन सुन्न करणारी घटना ही कचनेर तांडा नंबर (६) ता.पैठण येथे नुकतीच घडली.
यामुळे त्या दिवशी अख्या गावात कुणाच्या घरी चूल पेटली नव्हती जो तो एकमेकांना या संकटातून धीर देण्यासाठी पुढाकार घेत आहे. या दुर्देवी घटनेने गावात शोककळा पसरल्याचे दिसून आली. या छोट्याश्या गावातील नागरिकांनी अशा स्वरुपाचे संकट या अगोदर कधी पाहिले किंवा अनुभवले नव्हते.
या घटने विषयी अधिक माहिती अशी की,कचनेर तांडा नंबर (६) येथील अर्जुन रामदास जाधव (वय ५०) यांची सुनबाई काजल सुरेश जाधव यांच्या प्रसुतीच्या दवाखान्यातील उपचाराच्या बिलाचे पैसे भरण्यासाठी दुचाकीने औरंगाबादला जात असतांना कचनेर काद्राबाद रस्त्यावर त्यांच्या दुचाकीला समोरून येणाऱ्या आयशरने समोरासमोर जोराची धडक दिल्याने या घटनेत त्यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला.
ही घटना शनिवार (दि.०४) डिसेंबर रोजी संध्याकाळी घडली होती. या जबर धक्यातून एकमेकांना धीर देत स्वतःला सावरून घेत जाधव कुटुंबीयांसह त्यांच्या नातेवाईकांनी चार दिवसापूर्वीच मयत अर्जुनराव यांचा तेराव्याचा कार्यक्रमाचा विधी पार पाडला होता.
वाडिलांच्या मृत्यूच्या दुःखातून स्वतःला सावरुन घेत त्यांचा २४ वर्षीय विवाहित मुलगा सुरेश जाधव हा नवजात मुलगा आजारी असल्याने त्याचे दवाखान्यात बिलाचे पैसे भरुन शनिवारी (दि. १७) औरंगाबादहून कचनेरकडे येण्यासाठी औरंगाबाद सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरुन दुचाकीवर येत होता.
दरम्यान निपाणी शिवारात येताच पुलाजवळ बीडहून औरंगाबादकडे जाणाऱ्या भरधाव क्रूझर जीपने सुरेशच्या दुचाकीला समोरुन उडविल्याने या भीषण अपघातात त्याचा जागेवरच मृत्यू झाला.
या घटनेने जाधव कुटुंबीयावर जणू दुःखाचा आभाळच कोसळला पंधरा दिवसाच्या दरम्यान वडिलां पाठोपाठ मुलाचा देखील अपघाताने मृत्यू झाल्याने सासू सोबत सुनेवरही विधवा होण्याचे प्रसंग ओढावले विशेस म्हणजे सुन काजल यांच्या वडिलांचे दोन वर्षापूर्वी दुचाकी अपघातात प्राण गेल्याने त्यांच्या आईवर देखील विधवा होण्याची दुर्देवी वेळ आलेली आहे.एकंदर या घटनेबद्दल सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात आहे.
जाधव कुटुंबीयासाठी शनिवारचा दिवस ठरला घातवार कारण अर्जुनराव जाधव सुनेच्या झालेल्या प्रसुतीच्या उपचाराचे बिलाचे पैसे भरण्यासाठी दुचाकीने औरंगाबादला जात असतांना वाटेतच त्यांच्यावर काळाने घाला घातला अन् दुचाकीला आयशर धडकल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. ही घटना शनिवारी (दि.०४) रोजी संध्याकाळच्या सुमारास घडली.
त्यांच्या मुलगावरही असेच दुर्देवी प्रसंग ओढावले कारण सुरेश हा देखील आजारी नवजात तान्हुला बाळाच्या बिलाचेच पैसे भरुन औरंगाबादहून घराकडे येत असतांना वाटेतच क्रूझरने दुचाकीला उडविल्याने घटनास्थळावरच तो गतप्राण झाला. ही घटना सुध्दा शनिवार( ता.१७) रोजी दुपारी घडली. त्यामुळे बाप-लेकांसाठी शनिवारचा दिवस हा घातवार ठरला. (Aurangabad Accident)
विशेष म्हणजे मयत सुरेश यांचा सासरा रविंद्र गणेश चव्हाण रा. अब्दुल्लापूर तांडा ता. पैठण यांचा पण दोन वर्षांपूर्वी कचनेर कमानीवर दुचाकीच्या अपघातात मृत्यू झाला.सदर घटनाही शनिवारीच घडली होती.त्यामुळे सासऱ्यासह बाप-लेकांसाठी शनिवारचा दिवस हा घातवार ठरल्याची चर्चा सद्या परिसरात होतांना दिसत आहे.