![Manoj Jarange Patil : जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षकांनी मध्यरात्री घेतली जरांगेंची भेट](http://media.assettype.com/pudhari%2Fimport%2Fwp-content%2Fuploads%2F2024%2F02%2FCopy-of-Untitled-Design-26-2.jpg?w=480&auto=format%2Ccompress&fit=max)
वडीगोद्री, पुढारी वृत्तसेवा: मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे- पाटील यांच्या आमरण उपोषणाचा आज (दि.१३) चौथा दिवस आहे. सोमवारी मध्यरात्री रात्री उपोषणाच्या तिसऱ्या दिवशी जालना जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्णनाथ पांचाळ आणि जालन्याचे पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल यांनी त्यांची अंतरवालीत भेट घेतली. या भेटीत त्यांनी जरांगे यांच्या तब्बेतीची विचारपूस करत पाणी तरी प्यावे. व डॉक्टरांना उपचार करु देण्याची विनंती केली. Manoj Jarange Patil
जरांगे यांनी पाणी तरी प्यावे ही प्रशासनाच्या वतीने विनंती करण्यासाठी आलो आहोत. जरांगे यांनी पाणी प्यावे आणि उपचार घ्यावेत. उद्या कॅबिनेट बैठकीत निर्णय होईल. त्यात काहीतरी घोषणा होईल. आमची विनंती आहे, तुम्ही प्रशासनाला सहकार्य करा, असे पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल म्हणाले.
अध्यादेश काढला. कायदा करा, अंमलबजावणी कधी करणार? अंमलबजावणी करणार का ते सांगा? अंमलबजावणी करणार नसाल तर तुम्हाला जे करायचे ते करा. बळाचा वापर करण्याचा विचार असेल, तर तो ही करा. समाजाला जे करायचे आहे ते समाज करेल, असा इशारा जरांगे यांनी अधिकाऱ्यांना दिला. सगे सोयरे अध्यादेशाचे कायद्यात रूपांतर होईपर्यंत आमरण उपोषण सोडणार नाही, असा इशारा जरांगे यांनी यावेळी दिला. शिवाय पाणी पिण्यास आणि तपासणी करण्यासही त्यांनी जिल्हाधिकारी यांना नकार दिला.
हेही वाचा