Manoj Jarange-Patil : मराठा आरक्षणामुळे ओबीसी आरक्षणाला धक्का लागत नाही : मनोज जरांगे- पाटील | पुढारी

Manoj Jarange-Patil : मराठा आरक्षणामुळे ओबीसी आरक्षणाला धक्का लागत नाही : मनोज जरांगे- पाटील

पुढारी ऑनलाईन डेस्क : राज्यात आतापर्यंत ५४ लाख कुणबी नोंदी आढळल्या आहेत. नोंदी सापडल्या आहेत, तर आरक्षण देण्यास कोणती अडचण आहे. मराठा आरक्षणामुळे ओबीसी आरक्षणाला धक्का लागत नाही, असे स्पष्ट करून आरक्षण देण्यासाठी राजकीय इच्छाशक्तीची गरज आहे. मतांसाठी आमच्याशी नेते खोटे बोलत आहात. मतांसाठी आमच्या पोरांचे वाटोळे करू नका, असे आवाहन मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे- पाटील यांनी केले. Manoj Jarange-Patil

जरांगे -पाटील यांनी अंतरवाली सराटीत (जि. जालना) आज (दि.१७) नागरिकांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, २४ तारखेनंतर दिवस वाढवून देणार नाही. आता माघार घेणार नाही. कायदेतज्ज्ञांच्या सल्ल्याने सरकारने २४ डिसेंबरपर्यंत वेळ मागून घेतली आहे. जे ठरलंय त्यानुसार २४ डिसेंबरपर्यंत आरक्षण द्यावे लागेल. मराठा समाज मागास सिद्ध झाला आहे. त्यामुळे मराठ्यांचा सरसकट ओबीसींमध्ये समावेश करा. नोंदी सापडल्याने ओबीसीतून आरक्षण देण्यास कुणीही रोखू शकत नाही. ओबीसींच्या लेकरांचे आम्ही काढून घेत नाही. मराठा आणि ओबीसी समाज आधीपासूनच एकच आहे. धनगर आरक्षणाला मराठा आरक्षणामुळे धक्का लागत नाही, त्यामुळे इतर समाजाला धक्का लागण्याचे कारण नाही, असे जरांगे यांनी यावेळी स्पष्ट केले. Manoj Jarange-Patil

मराठा आरक्षण मिळविण्यासाठी हा पहिला आणि शेवटचा लढा आहे. त्यामुळे मराठ्यांनो आता एकजुटीने लढा द्या. आता अपयश नाही, तर गुलालाच हाती घ्यायचा, असा निर्धार करून आता लढताना ताकद आणि बुद्धी दोन्ही वापरावी लागेल, असे जरांगे यांनी सांगितले. एक नोंद सापडल्यास घरातील सर्वांना दाखले द्या. काही अधिकारी आमच्या जिल्ह्यात नोंदी सापडत नसल्याचे खोटे सांगत आहेत. काही अधिकारी मस्तीखोर आहेत. मराठ्यांच्या एकाही नोंदीला चॅलेंज होऊ शकत नाही. शिंदे समितीला त्यांचे काम सुरू ठेवण्यासाठी मुदत वाढवून द्या, असेही ते म्हणाले.

हेही वाचा 

Back to top button