

उमरगा : मराठा समाजाला आरक्षण मिळत असताना काही जण आरक्षण मिळू नये, यासाठी राजकीय स्वार्थ ठेवून समाजात जातीय तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत. परंतु, आपण विचलित न होता एकमेकांत झुंजायचे नाही. २४ डिसेंबरनंतर मराठ्यांना सरसकट आरक्षण मिळणार आहे. मात्र, मराठा आरक्षणात अडथळे निर्माण करणाऱ्यांचा नक्कीच त्याच्यातील दम बघणार आहे, असा इशारा मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे- पाटील यांनी दिला. ते उमरगा (जि. धाराशिव) येथे जाहीर सभेत बोलत होते. Manoj Jarnge Patil
उमरगा शहरातील छत्रपती शिवाजी महाविद्यालयाच्या २० एकर खुल्या मैदानावर सकल मराठा समाजाच्या वतीने रविवारी (दि १०) जरांगे -पाटील यांची सभा झाली. Manoj Jarnge Patil
जरांगे म्हणाले की, मागील ७० वर्षापासून मराठा समाजाला आरक्षणापासून वंचित ठेवणाऱ्या सरकारला आता मराठ्यांच्या रेट्यामुळे सर्वत्र मराठा, कुणबी असल्याच्या नोंदी सापडत आहेत. आतापर्यत ३५ लाख नोंदी आढळून आल्या आहेत. हाच पुरावा आता मराठ्यांना हक्काचे आरक्षण देणार असून तो सुवर्णक्षण आता जवळ आला आहे.
१७ डिसेंबररोजी अंतरवाली सराटी येथे बैठक होणार आहे. यावेळी पुढची दिशा समाजासोबत विचार करून ठरविली जाणार आहे. आरक्षणासाठी जीव गेला तरी मागे हटणार नाही, असा निर्धार बोलून राज्यातील सर्व उपोषणकर्ते, डॉक्टर, वकील, व्यावसायिक, स्वयंसेवक आणि बांधवांनी उपस्थित राहावे, असे आवाहन जरांगे यांनी केले.
दरम्यान उमरगा शहरात जरांगे यांचे आगमन होताच स्वागतासाठी महामार्गालगत उभ्या करण्यात आलेल्या ५१ जेसीबीतून पुष्पवृष्टी करण्यात आली. त्यानंतर सात क्विंटल वजन व पंचवीस फूट लांब फुलांच्या हाराने त्यांचे जंगी स्वागत करण्यात आले. सभास्थळापर्यंत भव्य रॅली काढण्यात आली.
शांततेत आंदोलन करणे हा संविधानाने आम्हाला दिलेला हक्क आहे. मराठा आरक्षणाचा विषय संपवायचा मराठ्यांनी ठरवले. आमच्या चूक काय या प्रश्नाचे उत्तर सरकारकडे नाही. मराठ्यांना मोडून काढण्याचे सरकारचे षड्यंत्र होते. पण आम्ही भिलो नाही. जे भिले ते मराठे नाहीत, असे जरांगे म्हणाले.
शहर व सभा स्थळी १ हजार तरुण तरुणी स्वयंसेवका सह तगडा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. त्यात पोलीस उपाधीक्षक १, पोलीस निरीक्षक १, सहाय्यक पोलिस निरीक्षक ५, फौजदार ५, दंगल नियंत्रण पथक व शीघ्र कृती दल तुकडी, १०० पुरुष व महिला पोलीस कर्मचारी, जिल्हा वाहतूक शाखेचे कर्मचारी तैनात करण्यात आले होते.
समाज बांधवांसाठी ठिकठिकाणी चहापाणी व अल्पोपहाराची व्यवस्था करण्यात आली होती. शिस्तबध्द नियोजन, सभा संपल्यानंतर संपूर्ण मैदानाची स्वयंसेवकांनी केलेली स्वच्छता हे सभेचे प्रमुख वैशिष्ट्य ठरले. मराठा व्यापारी बांधवांनी अल्पोपहार, सभेच्या ठिकाणी मुस्लीम समाज बांधवांनी पाण्याचे पाऊच तर समस्त मातंग समाज बांधवांनी चहाची सोय केली होती. समस्त बौद्ध समाज बांधवांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर चहाची व्यवस्था केली.
गावागावात स्वागत कमानी व फलक लावण्यात आले होते. तसेच कार्यक्रम स्थळापर्यंत लावण्यात आलेल्या मोठमोठ्या स्वागत फलकांनी नागरिकांचे लक्ष वेधून घेतले. तर सभास्थळी मुलींनी मराठमोळ्या वेशभुषेत केलेल्या स्वागताने उपस्थित जनसमुदाय भारावून गेला.
हेही वाचा