

बिलोली: पुढारी वृत्तसेवा: शेतामध्ये कापूस वेचणाऱ्या महिलेचा हात पकडून छेड काढणाऱ्या बिलोली येथील वादग्रस्त लाईनमन उत्तम टिप्परसे याच्याविरूद्ध बिलोली पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा नोंद करण्यात आला आहे. ही घटना मौजे अंजनी येथे १८ नोव्हेंबररोजी दुपारी घडली होती.
बिलोली तालुक्यातील मौजे अंजनी येथील शेतमजूर लालाबाई भोईवार दुपारी गावातील एका महिलेसोबत सरपंच महेश हांडे यांच्या शेतामध्ये कापूस वेचणी करत होती. त्यावेळी महावितरणचा वादग्रस्त लाईनमन उत्तम टीप्परसे तेथे आला. त्याने शेतामध्ये कोण कोण आहेत? म्हणत महिलेच्या एकटेपणाचा गैरफायदा घेऊन वाईट हेतूने हात पकडून छेड काढली. महिलेने घाबरून आरडाओरडा केला. सरपंच महेश हांडे यांनी लाईनमनला तेथून घालवले. या गंभीर प्रकाराने मानसिक धक्का बसलेल्या महिलेने मंगळवारी (दि.२१) बिलोली पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दिली. त्यानंतर उत्तम टिप्परसे विरूद्ध गुन्हा नोंद केला आहे. पोलीस निरीक्षक गणेश सोंडारे यांच्या मार्गदर्शनाखाली हेड कॉन्स्टेबल प्रभाकर गुडमलवार पुढील तपास करीत आहेत.
उत्तम टिप्परसे याने बिलोली शहरात अनेक कारनामे केले आहेत. हजेरी पटावर आठवडाभर अनुपस्थित असूनही त्याने वीज कनेक्शन खंडित करतो, अशी महिलांना धमकी देवून पैसे वसूल केले आहेत. याची लेखी तक्रार ऑगस्ट महिन्यात करण्यात आली होती. परंतु, वरिष्ठ अधिकाऱ्यांनी चौकशीच्या नावाखाली प्रकरण दडपून टाकले.
हेही वाचा