वडीगोद्री, पुढारी वृत्तसेवा : नारायण गडाचे शिवाजी महाराज नारायणगडकर यांनी आज मनोज जरांगे पाटील यांची भेट घेऊन मनोज जरांगे यांनी पाणी आणि उपचार घेण्याची विनंती केली. मात्र, ही विनंती मनोज जरांगे- पाटील यांनी नाकारत पाणी आणि उपचार घेण्यास नकार दिला आहे. मी समाजाच्या कल्याणासाठी कठोर भूमिका घेत असून गडाचा नेहमीच आदर केला आहे. मात्र, या वेळेस गडाच्या गादीने मला माफ करावे, असे मनोज जरांगे म्हणाले. (Manoj Jarange)
मराठा आरक्षणाचे श्रेय कुणी घ्यायचे यावरून मराठा आरक्षण लटकल असून यांच्यात श्रेय वादावरून भांडण सुरू असल्याचा आरोप जरांगे यांनी सरकारवर केला.
प्रत्येकाचे आपल्या कुटुंबावर प्रेम असते. तसे माझ्या कुटुंबावर माझं प्रेम असून माझं एकदा आंदोलन सुरू झाले की, माझं कुटुंब मला भेटायला येत नाही. पण आज जरांगे यांची आई त्यांना भेटायला आल्याचा उल्लेख करत माझं कुटुंब माझ्या समोर आणू नका. मला हुंदका दाटून येतो, असं सांगत जरांगे यांनी कुटुंबाला समोर न आणण्याचे सांगितले. तुमचा मुलाला समाजासाठी मृत्यू आला तरी रडू नका, असेही त्यांनी कुटुंबाला बजावले. घरी आलो तर तुमचा, मेलो तर समाजाचा असे ते कठोर पणाने कुटुंबीयांना म्हणाले.
आरक्षण द्या, नाही तर मराठ्यांशी लढा, हे दोनच पर्याय सरकार समोर आहेत, असे जरांगे म्हणाले. दुसऱ्या टप्प्यात शांततेत आंदोलन सुरूच असून आंदोलनाचे किती टप्पे आहेत, हे आम्हालाच माहीत आहेत. शिवाय सगळ्या गावात आरक्षण मिळेपर्यंत साखळी उपोषण सुरूच राहील, असा इशारा त्यांनी दिला.
डॉक्टर म्हणतात किडनीवर परिणाम होईल. मला काही झाले, तर समाज आंदोलन करेल. मला काही होऊ द्यायचं नसेल तर आरक्षण द्या. माझं ह्रदय बंद पडले, तर सरकारचे ह्रदय बंद पडेल, असा इशारा जरांगे यांनी दिला.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दोन दिवसांत माझ्याशी चर्चा करण्यासाठी अंतरवालीत यावे. मला बोलता येत आहे, तोपर्यंतच यावे, तुम्हाला कुणीही त्रास देणार नाही. उलट तुमच्या गाड्यांना संरक्षण देऊ. पण माझे बोलणे बंद झाल्यावर तुम्ही आला, तर हे मराठे तुम्हाला भयानक त्रास देतील, असा इशारा त्यांनी दिला.
हेही वाचा