हिंगोली, पुढारी वृत्तसेवा हिंगोली ते कळमनुरी मार्गावर कळमनुरी शिवारात भरधाव कार दुभाजकावर आदळून झालेल्या अपघातात पती-पत्नीचा जागीच मृत्यू झाला आहे. तर मुलगा गंभीर जखमी झाला आहे. आज (रविवार) सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास कळमनुरी शिवारात हा भीषण अपघात घडला.
या अपघातात प्रा. जयप्रकाश पाटील कावरखे, मंजूषा जयप्रकाश पाटील कावरखे यांचा मृत्यू झाला आहे. ते सेनगाव तालुक्यातील गोरेगाव येथील रहिवासी होते. अपघातातील दांपत्याचा मुलगा पराग पाटील गंभीर जखमी झाला आहे. त्याला उपचारासाठी नांदेडला हलविण्यात आले आहे. जिजामातानगर भागातील रहिवासी प्राध्यापक जयप्रकाश पाटील, त्यांची पत्नी मंजूषा पाटील व मुलगा पराग पाटील हे तिघे जण त्यांच्या कारने नांदेडकडून हिंगोलीकडे निघाले होते. त्यांची कार कळमनुरी शहरापासून काही अंतरावर आली असताना पराग याचे वाहनावरील नियंत्रण सुटले. त्यामुळे कार दुभाजकावर आदळून रस्त्याच्या खाली जाऊन तीन ते चार वेळा उलटली. या अपघातात कारमधील प्राध्यापक पाटील व त्यांची पत्नी मंजूषा यांचा जागीचा मृत्यू झाला. तर मुलगा पराग गंभीर जखमी झाला.
अपघाताची माहिती मिळाल्यानंतर कळमनुरी पोलिस ठाण्याचे निरीक्षक वैजनाथ मुंडे, जमादार प्रशांत शिंदे, कैलास सातव, राष्ट्रीय महामार्गाचे उपनिरीक्षक शेख उमर, शेलेश मुदीराज, सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक सय्यद तय्यब, राठोड यांच्या पथकाने घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी जखमी पराग याला उपचारासाठी कळमनुरीच्या ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. मात्र त्याची प्रकृती गंभीर असल्याने त्याला उपचारासाठी नांदेड येथे हलविण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले.
दरम्यान, प्रा. जयप्रकाश पाटील कावरखे हे मुळचे गोरेगाव येथील रहिवासी आहेत. कळमनुरीच्या महात्मा फुले विद्यालयात त्यांनी प्राध्यापक म्हणून काम केले असून मागील चार ते पाच वर्षापूर्वीच ते सेवानिवृत्त झाले होते.
हेही वाचा :