तुळजापूर तालुक्यातील विकासकामांवरून मधुकरराव चव्हाण आक्रमक
तुळजापूर; पुढारी वृत्तसेवा: महाराष्ट्र जीवन प्राधिकरण यांच्याकडून तुळजापूर तालुक्यात राबविण्यात येत आहेत. या पाणीपुरवठा योजना केवळ गुत्तेदाराला लाभ देण्यासाठी होत आहेत. प्रत्येक गावाच्या जवळ पाण्याची उपलब्धता असताना दूरवरून पाणी आणण्याच्या योजना का करण्यात येत आहेत ?, असा सवाल धाराशिव जिल्ह्याचे माजी पालकमंत्री मधुकरराव चव्हाण यांनी केला. ते तुळजापुरात आज (दि. १३) पत्रकार परिषदेमध्ये बोलत होते.
तुळजापूर तालुक्यात जल जीवन मिशन अंतर्गत प्रस्तावित करण्यात आलेल्या योजना केमवाडी ते सावरगाव 6.33 कोटी, जळकोट 5.14 कोटी, केशेगाव तालुका उस्मानाबाद 6.25 कोटी, सलगरा दिवटी होर्टी 6.76 कोटी , तामलवाडी मंगरूळ काटगाव 11.36 कोटी, अणदूर व चिवरी 10.35 कोटी, नंदगाव सिंदगाव 5. 99 कोटी, काक्रंबा व आपसिंगा – 8.23 कोटी, करजगांव व कानेगाव 11.5 कोटी आशा असून या योजना प्रत्यक्षात कार्यवाहीसाठी चुकीच्या असल्याचा दावा चव्हाण यांनी केला.
गावाजवळ असणारा जलस्त्रोतांचा उपयोग करून योजना राबविण्यात याव्यात. त्यामुळे ग्रामपंचायतीवर कोणताही आर्थिक ताण पडणार नाही. वेळ प्रसंगी गावाजवळ असणारा जलस्त्रोत या योजनांमध्ये समाविष्ट करावा. या योजना प्रत्येक गावनिहाय आणि कमी खर्चाच्या कराव्यात, अशी मागणी यावेळी चव्हाण यांनी केली. जल जीवन मिशन अंतर्गत या कामांच्या अधिकाऱ्यांशी चर्चा करून सूचना दिल्या आहेत. तुळजापूर शहरातील रस्ते बंद करण्याचा निर्णय अत्यंत चुकीचा आहे. मोठ्या प्रमाणावर होणारी गर्दी नियंत्रित करण्यासाठी सर्व रस्ते खुले राहणे गरजेचे आहे, असे ते यावेळी म्हणाले.
हेही वाचा