परभणी, पुढारी वृत्तसेवा पालम तालुक्यातील आरखेड येथे एकाचे मातृछत्र तर दुसर्याचे पितृछत्र ही हरवलेल्या दोन संख्या चुलत भावांवर काळाने घाला घातल्याची घटना समोर आली आहे. एकजण दि.30 एप्रिल रोजी पाण्यात बुडाल्याने तर दुसऱ्याचा दि.1 मे रोजी अपघातामुळे मृत्यू झाला. या दोघांचा लागोपाठोपाठ दोन दिवसांच्या अंतराने मृत्यू झाल्याने आरखेड गावावर शोककळा पसरली आहे.
पालम तालुक्यातील आरखेड येथील राजकुमार तुकाराम दुधाटे (वय 30) हे दि.28 एप्रिल रोजी सकाळी गावालगतच्या गोदावरी नदीत पोहण्यासाठी गेले होते. त्यांना पाण्याचा अंदाज न आल्यामुळे ते नदीच्या पाण्यात बुडाले. दरम्यान दोन दिवस ग्रामस्थांनी राजकुमार दुधाटे यांचा शोधाशोध घेतला पण थांगपता लागला नव्हता. नंतर दि.30 एप्रिल रोजी गोळेगाव शिवारातील गोदावरी नदीपात्रात त्यांचा मृतदेह आढळला. त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कारासाठी चुलत भाऊ नितीन मारोतराव दुधाटे (वय 27) गेला होता. त्यालाही दोन दिवसानंतर काळाने गाठले असून, त्यांचा नांदेडवरून पालमकडे येत असताना सोमवारी (दि.1) रात्री 9 वाजता अपघात झाला. दिवसभराचे कामकाज आटोपून दुचाकीने नितीन दुधाटे हे पालमकडे निघाले होते. त्यांच्या मोटारसायकलला पालमहून भरधाव वेगात येणार्या ऑटोची धडक बसली. यातच नितीन दुधाटे यांचा जागीच मृत्यू झाला.
नितीन दुधाटे हे नांदेड जिल्ह्यातील पशुवैद्यकीय दवाखान्यात नोकरीस असल्याची माहिती मिळाली आहे. एकाच घरातील दोन्ही कर्ते पुरूष गेल्याने दुधाटे कुटुंबीयांवर शोककळा पसरली आहे. राजकुमार दुधाटे यांच्या पश्चात आई-वडील, पत्नी, तीन मुली, एक बहीण असा परिवार असून, त्यातील एका मुलीचे वय दीड वर्षे देखील नाही. मयत नितीन दुधाटे यांच्या पश्चात आई, पत्नी, एक बहीण असा परिवार असून, त्यांच्या विवाहाला दोन वर्षही झाली नाहीत. त्यांच्या पार्थिवावर मंगळवारी (दि.2) दुपारी 12 वाजता अंत्यसंस्कार करण्यात आले. या दुर्देवी घटनांमुळे गावावर शोककळा पसरली आहे.
हेही वाचा :