Mumbai-Nagpur Samruddhi Expressway : समृद्धीवरून जायचे तर आधी वाहनांच्या टायरमध्ये नायट्रोजन भरा
छत्रपती संभाजीनगर: रवी माताडे : समृद्धी महामार्गावर होणाऱ्या अपघातांची आणि त्यात मरण पावणाऱ्याची संख्या वाढत आहे. अनियंत्रित वेग आणि टायर फुटल्याने झालेल्या अपघातांची संख्या अधिक आहे. त्यामुळे साध्या हवेपेक्षा वाहनाच्या टायरमध्ये नायट्रोजन हवा भरण्याचे आवाहन अधिकाऱ्यांकडून केले जात आहे, मात्र लाखो रुपयांचे वाहन वापरणारे अवघ्या १२५ रुपये खर्चाकडे दुर्लक्ष करून अमूल्य जीव धोक्यात घालत आहेत.
आरटीओ समृद्धी महामार्गावरून प्रवास करणाऱ्या वाहनांच्या तपासणीसाठी प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांनी १० एप्रिलपासून तपासणी मोहीम सुरू केली आहे. समृद्धी महामार्ग असलेल्या राज्यातील सर्व जिल्ह्यांतील मार्गावर ही मोहीम राबविण्यात येत आहे. वाहनाची आणि टायरची स्थिती, सीट बेल्टचा वापर, वेगावर नियंत्रण ठेवणे आणि लेनचा वापर आदींबाबत चालकांचे समुपदेशन केले जात आहे. घासलेले व जीर्ण झालेले टायर असलेल्या वाहनांना समृद्धी महामार्गावरून प्रवास करण्यास मनाई केली जात आहे. जिल्ह्यातील एन्ट्री व एक्झिट पॉईंटवर ही तपासणी होत असून, अशी वाहने समृद्धी महामार्गावरून परत पाठविली जात आहेत. सुरक्षेबाबत जनजागृती करणे, हा या मोहिमेचा उद्देश आहे, असे प्रादेशिक परिवहन अधिकारी विजय काठोळे यांनी सांगितले.
फिटनेसवेळीच होते टायरची तपासणी
ट्रान्स्पोर्ट वाहनांसाठी दर दोन वर्षांनी फिटनेस प्रमाणपत्र घेणे बंधनकारक आहे. तसेच ८ वर्षांपेक्षा जास्त जुने वाहन असेल, तर अशा वाहनांसाठी दरवर्षी हे प्रमाणपत्र घेणे, आवश्यक आहे. फिटनेस तपासणीवेळी वाहन निरीक्षक टायरच्या स्थितीचीही तपासणी करतात. खासगी वाहनांना हा नियम लागू नाही.