वडीगोद्री येथे भगरीतून १३ जणांना विषबाधा
वडीगोद्री; पुढारी वृत्तसेवा: अंतरवाली सराटी येथील एकाच कुटुंबातील सात जणांना उपवासाची भगर खाल्याने विषबाधा झाली होती. तर सध्या १3 ग्रामस्थांना उपवासाची भगर खाल्याने विषबाधा झाल्याचे निदर्शनास आले आहे. आज शुक्रवारी (दि.९) रोजी ही घटना उघडकीस आली आहे. यामुळे परिसरात उपवासासाठी भगर खाणाऱ्यांनी सावधान बाळगावी अशी चर्चा सुरू झाली आहे. यात महिलांचा समावेश जास्त आहे.
सर्वत्र नवरात्र उत्सव सुरू झाल्याने महिला वर्ग नऊ दिवस उपवास धरतात. उपवासाच्या दिवशी भगरिचा भात खाल्ला जातो. मात्र, या भगरीमुळे दि. ७ ऑक्टोबर रोजी अंतरवाली सराटी येथील एकाच कुटुंबातील सात जणांना विषबाधा झाली होती. आता उपचारानंतर त्यातील सहा जणांची प्रकृती स्थिर असून त्यातील एकजण औरंगाबाद येथे उपचार घेत आहे.
यानंतर अन्न व औषध प्रशासनाने वडीगोद्री येथील भगरीतून विषबाधा झालेल्या कुटुंबाची दवाखान्यात भेट घेऊन चौकशी करण्यात आली. या तपासादरम्यान त्यांनी अंबड येथील स्वाती ट्रेडर्स या दुकानात भेट देवून ३८ किलो भगर जप्त करण्यात आले आहे.
या भगरीचे नमुने मुंबई किंवा पुणे या ठिकाणच्या प्रयोग शाळेत पाठवले आहेत. परंतु, याच दरम्यान शुक्रवारी (दि.८) रोजी सायंकाळच्या सुमारास वडीगोद्री येथील आणखी दोन- तीन ग्रामस्थांना उलटी, मळमळ आणि चक्कर येवू लागली.
यानंतर रूग्णांनी समर्थ हॉस्पिटल वडीगोद्रीमध्ये उपचार घेत होते. त्याच दिवशी मध्यरात्रीच्या सुमारास एक- एक करून हॉस्पिटलमध्ये रुग्णसंख्या वाढत गेली. शनिवारीच्या पहाटे ३ वाजेपर्यत १३ रुग्ण हॉस्पिटलमध्ये दाखल झाले. यासर्वानी भगरीचे सेवन केल्यामुळे भगरीतूनच विषबाधा झाली असावी असा प्राथमिक अंदाज लावला जात आहे.
१३ जणांना विषबाधा
यामध्ये ज्ञानेश्वर बबनराव भवर (वय ३३), पुष्पाबाई जालिंदर भवर (वय ६०), सुनिता किशोर काळे (वय ४०), मंदा हरीभाऊ काळे (वय ६५), शिवकन्या सुनिल काळे (वय ३५), लक्ष्मीबाई नामदेव शेळके (वय ६५), संकेत सुनील काळे (वय १२), सुमित्रा राधकृष्ण काळे, राजेंद्र रघुनाथ राठोड (वय ३२), जनाबाई रामेश्वर गावडे (वय ४०), बाबुराव लिपणे (वय ३०), राणूजी कोरटकर (वय ५८), कोमल सुनिल खटके (वय २८) अन्य जणांना विषबाधा झाली आहे. भगरीमुळे विषबाधा झाल्याने भगर खावा का नाही? असा प्रश्न नागरिकांना पडला आहे.