Child Marriage | बीड: नांदण्यास नकार देणाऱ्या अल्पवयीन विवाहितेला अज्ञातस्थळी सोडले

Child Marriage | बीड: नांदण्यास नकार देणाऱ्या अल्पवयीन विवाहितेला अज्ञातस्थळी सोडले
Published on
Updated on

केज: पुढारी वृत्तसेवा : दहावीत शिकत असलेल्या अल्पवयीन मुलीचा तिच्या इच्छेविरुद्ध लग्न (Child Marriage) लावून दिले. तिला हे लग्न मान्य नाही व नांदणार नाही. असे म्हणताच तिच्या वडील, आजोबा आणि मामाने तिला एका गाडीत बसवून अज्ञातस्थळी सोडून पोबारा केल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी मुलीचे आई वडील, आजोबा, मामा, सासू सासरे आणि नवऱ्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अंबाजोगाई तालुक्यातील एका दहावीच्या वर्गात शिकत असलेल्या एका सतरा वर्षीय अल्पवयीन मुलीचा बालविवाह (Child Marriage) तिच्या इच्छेविरुद्ध १६ फेब्रुवारीरोजी तिच्या मामाच्या गावी मांगवडगाव (ता. केज) येथील शेतात औरंगाबाद येथील एका तरुणासोबत लावून दिला.

सदर अल्पवयीन मुलगी ही त्या विवाहास तयार नसताना बळजबरीने व धमकी देऊन तिचा विवाह लावून देण्यात आला. त्या नंतर सासू-सासरे आणि नवऱ्यासोबत एका गाडीने घेऊन ते औरंगाबादला घेऊन गेले. औरंगाबादला गेल्यास त्या रात्री अल्पवयीन मुलीने तिला हे लग्न मान्य नसल्याने इथे राहणार नाही; असे सांगितले. तेव्हा तिला सासरच्या मंडळींनी धमकावले तसेच तिच्या आई-वडिलांना फोन केला आणि हा प्रकार सांगितला.

त्यानंतर १८ फेब्रुवारीरोजी मुलीचे वडील, आजोबा आणि मामा हे गाडीने औरंगाबादला गेले. तिथे तिला सर्वांनी मारहाण केली. तिला त्यांच्यासोबत गाडीत बसवून एका अज्ञातस्थळी नेऊन सोडून दिले आणि ते सर्व निघून गेले. त्या अल्पवयीन मुलीने एका महिलेला तिची व्यथा सांगितल्यानंतर ती महिला व एक पुरुष यांच्या मदतीने तिने दौलताबाद पोलीस ठाण्यात जाऊन १८ फेब्रुवारीला रात्री ८ वाजता आई-वडील, आजोबा, मामा, सासू-सासरे, व नवरा यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला. सदर गुन्हा हा युसुफवडगाव पोलीस ठाणे हद्दीत मांगवडगाव येथील असल्याने युसुफवडगाव पोलीस ठाण्यात ७ जणांच्या विरुद्ध बालविवाह प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक योगेश उबाळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक रामधन डोईफोडे हे पुढील तपास करीत आहेत.

Child Marriage : एक महिन्यातील दुसरी घटना :

यापूर्वी २८ जानेवारीरोजी अशाच एका अल्पवयीन मुलीचे लग्न लावून दिले होते. या प्रकरणी युसुफवडगाव पोलीस ठाण्यात आई-वडील, मामा-मामी, सासू-सासरे, दीर-जाऊ, नवरा आणि मेव्हणा या १० जणांविरुद्ध गुन्हा दाखल झालेला आहे.

शहरी भागातील नवरदेव आणि नातेवाईक बालविवाहाला संमती कशी काय देतात ?

ऊस तोड होत असलेल्या आणि शिक्षणाचे प्रमाण कमी असलेल्या भागात बालविवाह होतात. परंतु औरंगाबाद सारख्या शहरातील नातेवाईकही कसे काय व बालविवाहाल संमती देतात हे विशेष आहे. मुलीचे वय १८ वर्ष आणि मुलाचे वय २१ वर्ष या पेक्षा कमी वयात त्यांचे लग्न केल्यास बालविवाह प्रतिबंधक अधिनियम २००६ नुसार लग्न लावून देणाऱ्यांना २ वर्षांचा कारावास आणि १ लाख दंड अशा शिक्षेची तरतूद आहे. मुलींचे प्रमाण कमी असल्याने बालविवाह होत आहेत. मुलींचे पालक हे जावयाच्या बाबतीत सरकारी नोकरी, घर, गाडी, जमीन, सोने, बँक बॅलेन्स अशा अपेक्षा असल्याने बालविवाहाचे एक कारण आहे.

हेही वाचा 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news